“एक सही संतापाची’ उपक्रमास मंचरमध्ये प्रतिसाद
मंचर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यभरात “एक सही संतापाची’ हा उपक्रम राबवला जात असून, या उपक्रमास सर्वांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवनिर्माण घडवल्याशिवाय राहणार नाही, असे मत मनसे पुणे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे यांनी मंगळवारी (दि. 11) व्यक्त केले.
मंचर तालुका आंबेगाव येथील एसटी बस स्थानकासमोर राज्य सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षांच्या विरोधात “एक सही संतापाची’ या उपक्रमास भेट दिली असता थिगळे बोलत होते. सामान्य नागरिकांच्या मनात राजकारणी लोकांवरील विश्वास लोप पावत चालला असून, कोणताही कोणत्याही पक्षात युती करत असेल तर हे लोकशाहीला घातक असणार आहे. असे विधान यावेळी समीर थिगळे यांनी केले.
मनसेच्या वतीने, राज्यातील सत्ता संघर्ष व राजकारणाचा जाहीर निषेध करण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या “एक सही संतापाची’ या उपक्रमास आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जनतेने याबाबत सही करून आपला संताप व्यक्त करावा, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष वैभव बाणखेले यांनी केले.
यावेळी दिनेश बाणखेले, तालुका अध्यक्ष संतोष बोऱ्हाडे, तालुका सचिव अशोक शेटे, शहर अध्यक्ष सागर घुले, घोडेगाव शहर अध्यक्ष विशाल शिंदे, विद्यार्थी सेनेचे मयुरेश लांडे, राहुल मोरडे, बाळासाहेब कातोरे आदी मनसेसैनिक उपस्थित होते.