पिकांचे मोठे नुकसान ः दोन दिवसांनंतरही पाणी जैसे थे
बेल्हे – जुन्नर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा हताश झाला आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसाने शेतात साठलेले पाणी शुक्रवारपर्यंत शेतात साठून राहिले. त्यामुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे.
राजुरी गावातील गोवर्धन ऍग्रो सर्विसेस या दुकानात पावसाची पाणी शिरल्याने दुकानातील काही खत व बियाणे भिजले आहेत. या पावसामुळे सोयाबीन, उडीद, बाजरी, तरकारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बांगरवाडीतील पाच ठिकाणच्या रस्त्यावरील पुलावरील भराव वाहून गेल्याने नागरिकांना दळणवळण करणे अवघड झाले आहे.
बेल्हे ते बांगरवाडी या मूळ रस्त्यावरील फुलाचा भरावा राहून गेल्याने रस्त्याच्या कडेला 15 ते 20 फूट खोल खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना ये जा करणे धोक्याचे झाले आहे.
अनेक शेतामध्ये पावसाचे पाणी साठले आहे; परंतु दोन दिवस झाले तरीही पाणी काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पाण्याखाली गेलेली शेती आता नष्ट होताना दिसत आहे. नुकसानीचे प्रशासनाने पाहणी करून पंचनामे करण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.