पिंपरी – उच्चशिक्षित महिला पुढे आल्या तर राजकारणाची परिभाषा बदलू शकते. विरोधी पक्षनेते अजित पवार हे नक्कीच उच्चशिक्षितांना उमेदवारी देतील, याची खात्री आहे, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी व्यक्त केला.
आल्हाट म्हणाल्या, “”केंद्र सरकारने प्रत्येक वस्तूत दरवाढ केली आहे. जनसामान्य यात भरडत चालले आहेत. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय याचा विचार करावा लागत आहे. शासनाच्या धोरणामुळे एकीकडे बेरोजगारी वाढली असताना करोनाच्या काळात अनेकजण बेरोजगार झाले आहेत. करोनानंतर व्यवसाय आता कुठे रूळावर येत असताना केंद्र सरकारने जीएसटी लावून महागाईच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. संसाराचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न सर्वसामांन्यांपुढे निर्माण झाला आहे. महागाईच्या विरोधात आंदोलन केले आणि पत्राद्वारे विनंतीही केली. मात्र, सरकार सर्वसामान्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.”
“”महिला आयोगाने आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या वेळी शहरातील 130 महिलांच्या तक्रारी आल्या होत्या. महिलांना स्वसंरक्षण करता यावे यासाठी त्यांना प्रत्येक प्रभागानुसार प्रशिक्षित करण्याचे काम हाती घेतले आहे. संसार वाचविण्यासाठी आम्ही त्यांचे समुपदेशनही करीत आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे फक्त राजकारणातच नव्हे तर संरक्षण दलातही आरक्षण मिळाले आहे, असेही आल्हाट म्हणाल्या.