पुरवठा सुरळीत करा, अन्यथा वीज बिल न भरण्याचा इशारा
रांजणी – आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील महाळुंगे, साकोरे, फुलेवाडी, ठाकरवाडी, टाकेवाडी आदी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे, यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा वीज बिल भरणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे
कळंब येथील उपकेंद्रामधून गेल्या तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होत असून, याबाबत मिळालेली माहिती अशी की, चासकर मळा विकासवाडी येथील विद्युत रोहित्र जळाल्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित केला होता. या रोहित्राची दुरुस्ती दिवसभर चालू होती. मंगळवारी (दि. 1) थ्री फेज विद्युत पुरवठा काही काळ खंडित केला, तर बुधवारी (दि. 2) दिवसभर वीज आलीच नाही. वीजवाहक तारा तुटल्याची माहिती देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना जनावरांना पिण्याचे पाणी देता आले नाही.
घरगुती वीज पंप बंद राहिले, घरातील पिठाच्या गिरणी बंद राहिल्या. शेतीला ठिबक सिंचनाद्वारे देण्यात येणारी औषधे शेतात टाकण्यात अडथळे निर्माण झाले. खंडित विद्युत पुरवठामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. याबाबत मंचर येथील कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी यांनी दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे तालुका अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ चासकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
25 वर्षांपूर्वीच्या तारा
25 वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या विद्युतवाहक तारा वारंवार तुटत आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केला जात नाही. पावसाळा सुरू होण्याआधी सर्व विद्युत उपकेंद्रांचा अहवाल घेतला जात नाही. मेंटेनन्स साठीचा खर्च कुठे केला जातो, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.