पिंपरी – अणू रेणू या थोकडा, तुका आकाशाएवढा, संत तुकोबारायांच्या आकाशाएवढ्या कार्याला साजेसा असा भव्य-दिव्य चित्रपट भविष्यात मी करेल अशी घोषणा हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी नोव्हेंबर 2012 मध्ये तीर्थक्षेत्र देहूगाव येथे केली होती. मात्र, देसाई यांच्या अकाली निधनाने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांना नोव्हेंबर 2012 मध्ये श्रीक्षेत्र देहूमध्ये प्रा. रामकृष्ण मोरे कला गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई उपस्थित होते. यावेळी देहूकरांशी संवाद साधताना देसाई यांनी तुकोबारायांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याची घोषणा केली होती. मात्र, बुधवारी (दि.2) सकाळी देसाई यांच्या अकाली निधनाची बातमी येताच तुकोबारायांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिल्यासंदर्भात सांगताना सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद यांनी जुन्या आठवनींना उजाळा दिला आहे.
कंद म्हणाले, अगदी सामान्य कुटुंबातून पुढे येत अफाट परिश्रमातून कलादिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये एक स्वतःचे स्थान देसाई यांनी निर्माण केले होते. जगद्गुरू तुकोबारायांच्या प्रति देसाई यांची प्रचंड निष्ठा व श्रद्धा होती. म्हणूनच आम्हा कार्यकर्त्यांच्या साध्या फोनवरून ते पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्या कार्यक्रमातच देसाई यांनी अणू रेणू या थोकडा, तुका आकाशाएवढा, संत तुकोबारायांच्या आकाशाएवढ्या कार्याला साजेसा असा भव्य-दिव्य चित्रपट भविष्यात मी करेल, अशी घोषणा केली होती. आम्हा देहूकरांना देसाई यांनी तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट करण्याचे स्वप्न दाखविले होते. मात्र, बुधवारी दुपारी देसाई यांच्या अकाली निधनाची बातमी आली अन् आम्हा देहूकरांना त्यांनी दाखवलेले स्वप्न मात्र अधुरेच राहिले आहे.