ओझर – केंद्र सरकारने इथेनॉलच्या धोरणामध्ये सातत्य राखले पाहिजे त्यातील फेर बदलामुळे शेतकरी अडचणीत येतात. ब्राझील देशात गरजेनुसार ऊसापासून साखर किंवा इथेनॉलची निर्मिती केली जाते. विमानाचे इंधन सुद्धा उसापासून बनविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. याबाबींचा केंद्र सरकारने विचार करणे गरजेचे आहे. केंद्राने निर्यात धोरणात बदल करण्याची गरज असून याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
श्री विघ्नहर सह साखर कारखाना विस्तारीत इथेनॉल प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. 13) निवृत्तीनगर येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, सुमित्रा शेरकर, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप कार्यकारी संचालक भास्कर घुले, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, बाळासाहेब दांगट, शरद सोनवणे, माजी नगरसेवक विशाल तांबे, जुन्नर बाजारसमितीचे सभापाती संजय काळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके, बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, विघ्नहर कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक, देवदत्त निकम, किशोर दांगट, अनिल मेहेर, अनंत चौगुले, दिलीप बाह्मणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लेंडे, पांडुरंग पवार, गुलाब पारखे, देवराम लांडे, मोहित ढमाले, अंकुश आमले आदींसह शेतकरी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, शेतकर्यांनी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर वर्षभर आंदोलन केले. त्यामुळे सरकारला शेतकर्यांच्या विरोधात केलेले काही कायदे बदलणे भाग पडले. सत्यशील शेरकर व त्यांच्या संचालक मंडळाने विघ्नहरची वाटचाल योग्य दिशेने सुरु ठेवली आहे. विघ्नहर कारखान्याने गळीत हंगाम 2022-23 मध्ये गाळप झालेल्या उसाला 3 हजार 50 रुपये प्रतिटन बाजारभाव दिला असून या नवीन प्रकल्पामुळे पुढील काळात त्यात अधिकची भर टाकता येईल, असेही ते म्हणाले
“केंद्र सरकारने साखरेची केलेली निर्यात बंदी व इथेनॉल वरील निबंध यामुळे साखर धंदा अडचणीत आला आहे. ग्राहकांना साखर स्वस्त द्या पण शेतकर्यांच्या खिशाला झळ देवू नका. अडचणीच्या काळातही विघ्नहरची वाटचाल चांगली आहे.” – बाळासाहेब थोरात, माजी महसूल मंत्री
“पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र दौर्यात शेतकरी वर्गाकडे लक्ष देण्याची गरज होती. दूध, सोयाबिन, कांदा पिकांचे पडलेले बाजारभाव आणि वाढती महागाई याबाबत ते काही न बोलल्यामुळे सर्वसामान्य शेतर्यांची निराशा झाली.” – डॉ. अमोल कोल्हे, खासदार
“यंदाच्या हंगामात विघ्नहर कारखान्याने आजपर्यंत 4 लाख 22 हजार 460 मे.टन ऊसाचे गाळप केले असून 4 लाख 29 हजार 500 क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 10.46 टक्के इतका आहे. या गाळप हंगामात अजून 5 लाख 50 हजार मे.टन ऊस उपलब्ध होईल व एकूण 9 लाख 50 हजार मे. टनाचे गाळप होईल. साखरेवरील निर्यात बंदी उठवावी. साखरेला किमान विक्री दर हा 3600 रुपयांच्या पुढे असावा. त्याचबरोबर केंद्र सरकारने 20 टक्के ज्यूट बॅग सक्तीने वापरण्याचे धोरण शिथील करावे,” -सत्यशील शेरकर, अध्यक्ष, श्री विघ्नहर साखर कारखाना
धामणखेलमध्ये धावले 550 बैलगाडे
कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने धामणखेल (ता. जुन्नर) येथे भव्य अशा बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतींमध्ये सुमारे 550 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये विशेष प्राविण्य संपादन करणार्या 6 बैलगाडा मालकांचा शरद पवार यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.