मंचर – कळंब ता. आंबेगाव येथे गेल्या पाच दिवसात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शेळ्या, बकरे, बंद घरे फोडून तसेच शेतीसाठी आवश्यक असणारे सिंचन योजनेतील ठिबक सिंचनचे साहित्य चोरून नेल्याच्या घटना घडल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. मंचर पोलिसांनी रात्रीची ग्रस्त सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कळंब परिसरात चोऱ्यांमुळे जवळपास शेतकरी बांधवांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असा अंदाज सरपंच उषा सचिन कानडे ,उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव आणि महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष महेश भालेराव यांनी व्यक्त केला आहे. कळंब येथे वर्पे मळ्यातील जनाबाई बबन एरंडे ही महिला घराजवळ बकरे चारत असताना दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने शेळीसह चार करडे गाडीत घालून पोबारा केला.
माळीमळा येथील ताराबाई सखाराम कानडे यांच्या बंदिस्त घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील रोख ५ हजार रुपये रक्कम चोरून नेली आहे. तसेच साडीत गुंडाळलेले पाच हजार रुपये वाचले असल्याचे त्यांनी सांगितले. कानडे वस्तीवरील शेतकरी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कानडे, उद्योजक ज्ञानेश्वर उर्फ माऊली कानडे, नंदकुमार कानडे या शेतकऱ्यांच्या शेतीतील ड्रीपच्या नळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचे जवळपास एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी आपले शेती उपयोगी साहित्य बंदिस्त ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. अज्ञात चोरटे हे दिवसभर वाडी वस्तीवर काही वस्तू विकण्याच्या निमित्ताने येऊन पाळत ठेवून अशा चोऱ्या करत आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कळंब परिसरात चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा मंचर पोलिसांनी लवकर तपास लावून सदर चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.