पुणे – पूलगेट ते हडपसर हा सुमारे आठ किलोमीटर लांबीचा मार्ग एकत्रित असल्यामुळे तो कोणी विकसित करावा, यासंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महामेट्रो यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली. या बैठकीत तांत्रिक विषयावर चर्चा झाली असून पुन्हा बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय घेतला जाणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम “पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. तर, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोने घेतले आहे. “पीएमआरडीए’ आणि महामेट्रोने दोन्ही मार्गांचे विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय “पीएमआरडीए’ने घेतला आहे. तर खडकवासला ते खराडी 28 किलोमीटर मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे. त्यानुसार “पीएमआरडीए’च्या विस्तारीत मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर पूलगेट, हडपसर आणि लोणी काळाभोर, तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे. तर महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पूलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे. या दोन्ही मार्गावर पूलगेट ते हडसपर हा मार्ग एकत्रित असल्यामुळे तो कोणी विकसित करावा, असा प्रश्न निर्माण झाला. यासंदर्भात पीएमआरडीए आणि महामेट्रो यांची एकत्रित बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये तांत्रिक विषयावर चर्चा झाली. त्यानंतर पुन्हा बैठक घेण्याचे ठरले. त्यानंतर निर्णय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव पुणे युनिफाईड अर्बन ट्रान्सपोर्ट ऍथॉरिटी अर्थात “पुम्टा’ समितीसमोर सादर करण्यात येणार आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला वेग
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाने वेग घेतला आहे. सुमारे 23 किलोमीटर लांबीच्या मार्गावर विद्यापीठ रस्ता आणि हिंजवडी येथे एकूण 10 खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे.
हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कार्यरत आहेत. या ठिकाणी दैनंदिन कामकाजासाठी सुमारे दोन लाख नागरिक येत असतात. वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर “पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प हाती घेतला. या मेट्रो प्रकल्पामुळे हिंजवडी येथील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर एकूण 23 स्थानके असणार आहे. या मार्गावर बॅरीकेडींगचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय विद्यापीठ रस्ता आणि हिंजवडी येथे खांब उभारणीसही सुरुवात झाली आहे. याचसह हिंजवडी येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या स्थलांतराचे काम वेगाने सुरू आहे. सध्या सव्वाआठ किलोमीटर लाईन्सचे स्थलांतराचे काम पूर्ण झाले असून आता फक्त शेवटचे साडेचारशे मीटर अंतराच्या लाईन स्थलांतराचे काम उरलेले आहे, अशी माहिती मेट्रोकडून देण्यात आली.