पुणे- अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले आंबे लंपास करणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवणार असल्याचे चित्र आहे. याप्रकरणी तातडीने खुलासा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अतिक्रमण विभागास दिले आहेत. दरम्यान, ही कारवाई अतिक्रमण विभागाच्या मध्यवर्ती पथकाने केली आहे. तसेच संबंधित व्यक्तीच आंबे परत नेण्यास आला नसल्याने आंबे खराब झाल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. त्यामुळे, हे प्रकरण अंगावर शेकणार असे दिसताच या विभागाकडून शासकीय सुट्ट्या, संबंधित व्यक्ती आंबे नेण्यास आली नाही, चुकीच्या लोकांकडे विचारणा केली असा दावा केला जात आहे. मात्र, थेट महापालिका आयुक्तांनीच या प्रकरणाची दखल घेतल्याने हे प्रकरण अनेकांना अडचणीत आणणार असल्याचे चित्र आहे.
तक्रारीमुळे उघडकीस आला प्रकार
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयस्तरावरील तसेच मध्यवर्ती कार्यालयाकडील पथकाकडून शहरात अशाप्रकारची अतिक्रमण कारवाई दररोज केली जाते. त्या असा नाशवंत माल मोठ्या प्रमाणात जप्त केला जातो. प्रामुख्याने भाजी तसेच इतर लगेच खराब होणारे साहित्य असल्यास विक्रेते सोडविण्यास येत नाहीत. मात्र, फळे असल्यास ती काही दिवस टिकत असल्याने विक्रेते ते दंड भरून घेऊन जातात. अशावेळी दंडासोबतच पथकाकडून फळे लाटण्याचे प्रकार वारंवार घडतात. मात्र, महापालिकेशी वाद नको म्हणून अनेकजण पैसे देऊन बाजूला होतात. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्याने असे प्रकार घडतात; यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच विक्रेते न आल्यास हे जप्त केलेले साहित्य इतर विक्रेत्यांना नाममात्र दरानेही विक्री
केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, त्या करण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याने असे गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.
जप्त साहित्याचा पंचनामा का नाही…
महापालिकेने अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या साहित्याचा जागेवरच पंचनामा करणे तसेच विक्रेत्यांची माहिती ठेवणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात पालिकेकडून असे पंचनामेच केले जात नसल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे नेमके किती साहित्य जप्त केले. साहित्य कोणत्या प्रकारचे होते हे निश्चित होत नाही. तसेच जप्त केलेले साहित्य परस्पर विक्री केले असल्यास ते गोदामात नाही असे सांगत शहरभर विक्रेत्यांना पळविले जाते. त्यामुळे या घटनेनंतरही प्रशासन जागे होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.