पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत थेट शिक्षण आयुक्तांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही शासनाकडून कारवाई करण्याबाबत कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. शासनाला कारवाई करण्यास मुहुर्त कधी सापडणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागातील अधिकारी यांची कामकाज पद्धत, अव्वाच्या सव्वा रक्कमेचे रेटकार्ड याबाबत बैठकीत कडक शब्दांत ताशेरे ओढत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी गंभीरपणे दखल घेत चौकशी समिती नियुक्त करुन अहवाल मागविला होता.
या अहवालावरुन दोषी आढळलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गोडसे, राजकुमार बामणे यांना निलंबितही करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना नोटीस बजावून त्यांच्याकडुन खुलासा मागविण्यात आला होता. मात्र, अद्यापपर्यंत गायकवाड यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही.
आरटीई, स्वमान्यता प्रकरणात प्राप्त प्रस्तावात अकारण त्रुटी काढुन संबंधिताना आर्थिक गैरलाभाची अपेक्षा करण्यामुळे शासनाची जनमानसातील प्रतिमा मलिन झालेली आहे. शिक्षकांचे ऑक्टोबर २०२२चे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याबाबतचे शासन आदेश असतानाही विलंबाने वेतन अदा करणे, नियमित वेतनासाठी अनुदान वितरित केलेले असताना अन्य बाबींवर खर्च करणे, वेतन अनुदान खर्च न करता समर्पित करणे या वित्तीय शिस्त बिघडविण्याच्या बाबीसाठी गायकवाड यांना जबाबदार धरुन शिस्तभंग विषयक कार्यवाहीही शिक्षण आयुक्तलयस्तरावर सुरू आहे.
थेट पुणे विभागाबाहेर बदली होणार का ?
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दीड महिन्यापूर्वी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. गायकवाड यांची पुणे विभागाबाहेर अकार्य़कारी पदावर तात्काळ बदली करण्याबाबत प्रस्तावात नमुद केले आहे. शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या अनुंषगाने प्रयत्न करण्याकडे दुर्लक्ष करीत सचोटी, कर्तव्यपरायणता न दाखविता पदाला अशोभनीय होईल, असे वर्तन केले आहे. या कृतीमुळे औचित्यपूर्वक व नि:पक्षपातीपणे कामकाज करण्याच्या तत्वाला बाधा निर्माण झाल्याचा ठपका गायकवाड यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे.