राजगुरूनगर – खेडमध्ये भूसंपादन अधिकार्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील विरुद्ध रिंगरोड बाधित 12 गावातील काही शेतकरी एकवटले आहेत. मागील दोन दिवसांच्या पत्रकार परिषदेत आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्यांनतर शनिवारी (दि. 13) पुन्हा बाधित शेतकर्यांची पत्रकार परिषद झाली.
पत्रकार परिषदेला 12 गावांतील बाधित शेतकर्यांसह आमदार दिलीप मोहिते समर्थक युवक आणि महिला आल्याने वातावरण काहीसे तापले होते. मात्र बाधित शेतकर्यांनी त्यांनी भूमिका स्पष्ट केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
खेड तालुक्यातील 12 गावांत रिंगरोड प्रकल्पाच्या जमीन संपादन प्रक्रियेतील नुकसानभरपाई वरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्याद्वारे वादग्रस्त ठरत असलेल्या एका महसूल अधिकार्यामुळे खेडचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, बाधितांनी शनिवारी (दि 13) पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यावेळी आमदार मोहिते पाटील यांच्या विरोधात पुराव्यासह बोलण्याचे संकेत मिळाले होते. मात्र पत्रकारांच्या बरोबर मागे आणि विरोधकांच्या अगदी समोर उभे राहून आमदार मोहिते समर्थकांनी वातावरणच बदलून टाकले.
आमदार मोहिते पाटील यांच्या विरोधात टीका न होता पत्रकार परिषद संपन्न झाली. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला बाधितांच्या बाजूने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार सुधीर मुंगसे, भाजपाचे राम गावडे, अॅड. गणेश सांडभोर यांच्यासह अमोल पवार, पाटील बुवा गवारी, प्रसाद घेणंद व 12 गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आमदार मोहिते पाटील समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर सागर सातकर, माजी अध्यक्ष ईजाज तांबोळी, विद्यार्थ्यी काँग्रेस अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शहर अध्यक्ष पप्पू बनसोडे, दलित स्वयंसेवक संघाच्या जिल्हा अध्यक्ष अक्का गुंजाळ, शाम डोंगरे यांच्यासह आमदार समर्थक महिला व युवक उपस्थित होते.
“अधिकारी चुकीचे वागत असतील आणि आपल्याकडे पुरावे असल्यास तालुक्यातील दोन्ही महसूल अधिकार्यांवर कारवाई करून त्यांना घरी बसवावे आमची काहीही हरकत नाही. आमचे ते सोयरे धायरे नाहीत आम्ही त्यांची बाजू घेत नाही बाधित आम्ही कोणाची सुपारी घेतली नाही घेणार नाही. सुपारी बहाद्दर तर मुळीच नाही.” – अमोल पवार, शेतकरी नेते
“आम्ही सुपारी बहादुर नाही शेतकरी आहोत. रिंगरोड बाधित शेतकर्यांच्या बाजूने जो नेता प्रतिनिधी आहे त्यांच्या मागे आम्ही शेतकरी ठाम आहेत. रिंगरोड रस्ता बंधिस्त आहे त्यावरून सर्वसामान्य लोकांना जाता येणार नाही. शासनाचा व्यवसायिक प्रकल्प आहे. शेतकर्यांना जादा मोबदला मिळावा यासाठी आमची लढाई आहे. सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आले तर चांगले अन्यथा ते नाही आले तरी आम्ही आमचा लढा सुरूच राहिल.” – पाटील गवारी, अध्यक्ष, रिंगरोड विरोधी कृती समिती.