कर्मचाऱ्यांचा संप असला, तरीही नियोजनाप्रमाणेच कामकाज
पुणे – राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. तरीही राज्य मंडळाच्या वतीने सुरू असलेली इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे सुरू राहणार आहेत.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यासाठी मंगळवार (दि.14) पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनाही सहभागी होणार असल्याचे संघटनांनी जाहीर केलेले आहे.
दरम्यान सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी दहावीचा पेपर नाही. मात्र या दिवशी बारावीचे सकाळ व दुपारच्या सत्रात पेपर होणार आहेत. संपामुळे या परीक्षांवर काही विपरीत परिणाम होणार का ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येवू लागले आहेत.
दरम्यान विभागीय मंडळाचे अध्यक्ष, सचिव, विषयांचे मुख्य नियामक, केंद्र संचालक यांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परीक्षेसाठी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.