नगर – नगर शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सुकूलागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. मागील काहीदिवसापासून जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, काल पासून नगर शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
शहरासह परिसरात शुक्रवारी काही मध्यम, हलक्या प्रमाणात, तर शनिवार सकाळपासून सलग दुसऱ्यादिवशी पाऊस कोसळला. त्यामुळे नगर शहर व उपनगर परिसरात शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. पावसामुळे दिल्ली गेट, चितळे रोड, सर्जेपुरा, प्रोफेसर कॉलनी चौक अशा विविध भागांमध्ये पाणी साचले होते. रस्त्यांवरील खड्डे ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्यांचा अंदाज येत नसल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती.
मागील काही दिवसापासून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारा शेतकरी दोन दिवसापासून सुरु असलेल्या संतधार पावसाने अखेर काहीसा सुकावला आहे. अखेरच्या घटका मोजणाऱ्या खरीप पिकांना या पावसामुळे संजीवनी मिळाली आहे. तर रब्बीच्या पेरण्या करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, नगर, पाथर्डी, शेवगाव राहुरी यातालुक्यात काही भागता चांगला पाऊस झाला आहे. तर नेवासा, कोपरगाव राहाता, संगमनेर परिसरात पावसाने हुलकवणी दिली आहे. हवामान विभागाच्या वतीने पुणे, नाशिक, बरोबरच नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने ही नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.