पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – देशातील आयआयटी, एनआयटी संस्थांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात दोन मुलींसह ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यात महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जानेवारी आणि एप्रिल सत्रासाठी पेपर-१ बीई आणि बीटेकचा एकत्रित निकाल जाहीर केला आहे. यामध्ये ५६ उमेदवारांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यात दोन मुलींचा समावेश आहे. बहुतांश विद्यार्थी तेलंगणातील आहेत. तेलंगणातील १५, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी सात आणि दिल्लीतील सहा विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तब्बल २ लाख ५० हजार २८४ मुलांनी आयआयटी प्रवेश परीक्षा जेईई ऍडव्हान्स साठी पात्र ठरले आहेत.
परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या २९ उमेदवारांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना आता पुढील तीन वर्षांसाठी ही परीक्षा देता येणार नाही. या परीक्षेच्या दुसऱ्या सत्रात १० लाखांहून अधिक उमेदवार होते. आसाम, बंगाल, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूमध्ये य भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
जानेवारीच्या सत्रात २३ उमेदवारांनी १०० टक्के गुण मिळवले होते. तर एप्रिलच्या सत्रात ३३ उमेदवारांनी १०० गुण मिळवले आहे. एकत्रित निकालात १०० टक्के मिळालेल्या एकूण ५६ उमेदवारांपैकी ४० उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत. तर १० ओबीसी, ६ ईडब्ल्यूएस श्रेणीतील आहेत.