इंटरगव्हर्नल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजने (आयपीसीसी) जागतिक तापमानवाढीविषयी आपल्या ताज्या अहवालात ज्या विनाशाची शक्यता वर्तविली आहे, त्याची कल्पनासुद्धा अंगावर काटा आणणारी आहे. या वाईट परिस्थितीला आपले बेजबाबदार वर्तन आणि पिके हेच प्रमुख कारण ठरले आहे.
सुमारे आठ वर्षांनंतर आलेल्या या अहवालात असे म्हटले आहे की, सन 2030 पर्यंत पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढेल. ही परिस्थिती इतक्या लवकर येईल, याची कल्पनासुद्धा काही वर्षांपूर्वी कुणी केली नव्हती. या वाढलेल्या तापमानामुळे हवामानाशी संबंधित भयावह आपत्तींना आमंत्रण मिळणार आहे. पूर, वादळे, बर्फ वितळण्यापासून समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्यापर्यंत..!
समुद्राच्या स्तरवाढीशी जागतिक तापमानवाढीच्या असलेल्या संबंधांबाबत पहिल्यापासूनच वाद आहे; परंतु या अहवालात ज्या गांभीर्याने अधोरेखित केले आहे, त्यातून एक गोष्ट तर स्पष्ट आहे ती अशी की, या धोक्याबद्दल आपण नव्याने विचार करायला सुरुवात करायलाच हवी. जगातील अनेक शहरांप्रमाणेच भारतातसुद्धा एक मोठी लोकसंख्या समुद्रकिनारी भागांत राहते. जर अपेक्षेप्रमाणे समुद्रातील पाणीपातळी एक किंवा दोन मीटरने वाढली, तर या शहरांचा, गावांचा आणि शेतीचा मोठा हिस्सा कायमस्वरूपी नष्ट होऊन जाईल. या आव्हानाचा मुकाबला आपण कोणत्या मार्गाने करू शकतो, याविषयी आतापासूनच विचारमंथन करणे आवश्यक आहे.
जेणेकरून ज्यावेळी आपल्या समोर ही परिस्थिती उभी असेल, तेव्हा आपण तिचा सामना करण्यासाठी पूर्णतः तयार असू. कारण ही प्रक्रिया थांबण्यास शेकडो, हजारो वर्षे लागू शकतात. आपला हिंदी महासागर जगातील इतर महासागरांच्या तुलनेत खूप वेगाने गरम होत आहे. त्याचा थेट परिणाम अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांवर आणि पावसावर होईल. गेल्या काही वर्षांतील आपला अनुभव आपल्याला असे सांगतो की, विनाशकारी सागरी चक्रीवादळे दिवसेंदिवस अधिकाधिक प्रबळ होत चालली आहेत आणि त्यांची संख्याही वेगाने वाढत आहे.
पृथ्वीचे तापमान जर एक अंशाने वाढले तर पाऊस पाच ते सात टक्क्यांनी वाढतो. या हिशेबाने जर 2030 पर्यंत पृथ्वीचे तापमान दीड टक्क्याने वाढले तर त्याच हिशेबाने पाऊससुद्धा प्रचंड प्रमाणात पडेल. ढगफुटीचा आणि एकाच जागी प्रचंड पाऊस पडण्याचा धोकाही खूपच बळावेल. अवघ्या काही तासांत तब्बल पाचशे ते सहाशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याची चीन, जर्मनीसह जगातील अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. हा पाऊस जवळजवळ वर्षभराच्या सरासरीइतका होता. व्यवस्था कितीही चांगली उभारली, तरी एवढा पाऊस झाल्यास त्याचे व्यवस्थापन करता येणे शक्य नाही. अमेरिका, कॅनडा, तुर्की आदी देशांमधील जंगलांत आगी लागण्याचे संकट कायम आहे.
अर्थात, एक आशा अजूनही आहे आणि ती म्हणजे पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन रोखणे. पर्यावरणाला मूळ स्वरूप देण्याचा प्रयत्न करणे. आपल्या जीवनशैलीत बदल केल्याखेरीज हे कदाचित शक्य होणार नाही. सौरऊर्जेसारख्या परंपरागत ऊर्जास्रोतांकडे वाटचाल करण्याचा वेग आपल्याला कितीतरी अधिक पटींनी वाढवला पाहिजे. सोलर पॅनेलमध्ये होत असलेल्या गतिमान सुधारणांबरोबरच परंपरागत औष्णिक ऊर्जेच्या तुलनेत सौरऊर्जेपासून मिळणारी वीज भारतातच कितीतरी पटींनी स्वस्त झाली आहे.
जागतिक तापमानवाढीविषयी ताज्या अहवालात शहरी भागांमध्ये उन्हाळ्याच्या काळात तयार होऊ शकणाऱ्या “हीट ट्रॅप’कडे लक्ष वेधण्यात आले आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ठराविक भागात उष्णता कोंडली जाते. शहरांमध्ये हा धोका अधिक असण्याचे उघड कारण असे की, शहरांमधील हिरवाई आपण जवळजवळ नष्ट करून टाकली आहे.
विकासाच्या नावाखाली हिरवाईचा नाश केला गेल्याची असंख्य उदाहरणे आपल्यासमोर आहेत. वस्तुतः आता आपल्या अनेक चुका सुधारण्याची वेळ आली आहे. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. विनाशाच्या प्रक्रियेपेक्षा निर्मितीची प्रक्रिया नेहमीच खडतर असते. त्यामुळेच पूर्ण धैर्याने, नियोजनबद्ध रीतीनेच आपल्याला आपले लक्ष्य गाठता येऊ शकेल. हवामानातील संभाव्य बदलांना अनुकूल धोरणे आपल्याला तयार करावी लागतील. पावसाची तीव्रता वाढतच जाणार असल्यामुळे गावांमधून आणि शहरांमधून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल, अशी व्यवस्था आपल्याला उभारावीच लागेल.
लोकांच्या मानसिकतेत बदल करणे हीसुद्धा या संपूर्ण प्रक्रियेची एक महत्त्वपूर्ण सुरुवात ठरेल. त्याची सुरुवात आपल्याला शाळांपासून करावी लागेल, जेणेकरून आपल्यासमोर असलेल्या पर्यावरणीय आव्हानांबाबत नवी पिढी संवेदनशील होईल. जागतिक तापमानवाढीमुळे उभ्या राहिलेल्या आव्हानांचा मुकाबला ही एखाद्या व्यक्तीची, सरकारची किंवा संस्थेची लढाई नाही. लंकेला जाण्यासाठी वानरसेनेने उभारलेल्या सेतूप्रमाणे जोपर्यंत समाजातील प्रत्येक घटक या प्रक्रियेत आपले योगदान देत नाही, तोपर्यंत आपल्याला विजय मिळू शकणार नाही.