– अमित डोंगरे
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याने संयमी शतकी खेळी केली. त्याच्या खेळाचे सध्या प्रचंड कौतुक होत आहे. मात्र, ही केवळ शतकी खेळी नव्हती तर तो एक प्लॅन होता. राहुलने खेळपट्टीची नस अचूक ओळखली होती. म्हणूनच या एका प्लॅन शतकाची गोष्ट सांगण्याचा हा प्रयत्न.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजी दिली होती. ही नाणेफेक होण्यापूर्वी पाऊस पडला होता त्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. लॉर्डसची खेळपट्टी परंपरेप्रमाणे वेगवान गोलंदाजीला मदत करेल असा समज ज्यो रूटचा झाला. त्यातच पावसाळी वातावरणाने जेम्स अँडरसन, ओली रॉबिन्सन व मार्क वुड या गोलंदाजांनाही स्विंगसाठी लाभ होईल, असे त्याला वाटले. मात्र, भारतीय फलंदाजांनी विशेषतः हिटमॅन रोहितपेक्षा राहुलने ज्या पद्धतीने आपली खेळी प्लॅन केली त्याला तोड नव्हती. जगभरातील मोठे व दिग्गज फलंदाज याचसाठी त्याचे कौतुक करत आहेत.
राहुलने समोर रोहित आक्रमक फलंदाजी करत असताना अत्यंत शांतपणे खेळ केला. सुरुवातीची काही षटके गोलंदाजाला द्यायची व नंतरच्या तब्बल पाच सहा तासांच्या खेऴावर हुकुमत राखायची ही मोठ्या फलंदाजांची युक्ती राहुलनेही वापरली. त्याने सुरुवातीला अँडरसन आणि कंपनीला योग्य तो आदर दिला. चेंडूवर नजर स्थिर होण्याची तसेच खेळपट्टीचा अंदाज येण्याची वाट पाहिली. या खेळपट्टीवर क्रॉस सीम चेंडू अचानक उसळी घेत होते. तसेच इंग्लंडचे गोलंदाज ठरवून गोलंदाजी केल्यासारखे उजव्या हाताने फलंदाजी करत असलेल्या फलंदाजाला चौथ्या स्टम्पवर चेंडू टाकून आजमावत होते.
कधी कोणता फलंदाज बाहेरच्या चेंडूला बॅट लावतो का याची ते वाट पाहात होते. मात्र, रोहित व राहुलने त्यांच्यावर कडी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांची नीती चौथ्या स्टम्पवर नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याचीच असते हा इतिहास आहे. विराट कोहलीची विकेट पाहिली की लगेच लक्षात येते की त्यांच्या जाळ्यात कोहली कसा अलगद अडकला. रोहितने आक्रमक खेळी केली मात्र, त्याला शतकाने हुलकावणी दिली. त्यानंतर चेतेश्वर पुजाराही लवकर परतला. मग कोहलीने राहुलच्या साथीत डाव सावरला पण तोही अपयशी ठरला. समोरच्या बाजूने एकेक फलंदाज बाद होत असताना राहुल मात्र शांत होता. डोक्यावर बर्फ ठेवून आल्यासारखा खेळत होता. फार पूर्वी हे कार्य राहुल द्रविड करत असे.
राहुलने खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर मात्र खांदे खुले करत चौकार व षटकारांनी आपली शतकी खेळी सजवली. त्याच्या या खेळीत काय नव्हते. कट, पुल, स्टिअर, ग्लान्स, स्ट्रेट ड्राइव्ह, ऑन ड्राइव्ह आणि कव्हर ड्राइव्ह या सगळ्या फटक्यांचे त्याने प्रदर्शन मांडले. कसोटी क्रिकेटमध्ये अशी प्लॅन खेळी पूर्वी विक्रमादित्य सुनील गावसकर, स्टिव्ह वॉ, राहुल द्रविड हे फलंदाज करायचे. एकच गणित या मागे असते.
दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली की संपूर्ण वेळेतील 90 षटके खेळता आली पाहिजेत. त्यातच सकाळच्या सत्रातील पहिली 15 षटके समोरच्या व्ही मध्ये खेळून काढायची आणि एकदा का चेंडूवर नजर स्थिरावली व खेळपट्टीचा अंदाज आला की हात मोकळे करायचे. त्यातचही बाहेरच्या चेंडूची छेडखानी करायची नाही.
मिडल व लेग स्टम्पवरील चेंडूवरच जास्त धावा करायच्या आणि बाहेर जात असलेल्या चेंडूवर डीप कव्हरला क्षेत्ररक्षण नसेल तरच चौकार खेचायचे हा मोठ्या फलंदाजांचा शतकाचा प्लॅन असतो त्याचाच कित्ता राहुलनेही गिरवला. भारताला गेली अनेक वर्षे अशा फलंदाजाची गरज होती, ती राहुलच्या रूपाने पूर्ण होत आहे असे म्हणायला हरकत नाही.