राहाता -शासन निर्णयाप्रमाणे पुर्नगठीत झालेल्या कर्जावर सुरु ठेवलेली व्याजाची आकारणी माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जिल्हा सहकारी बॅंकेस स्थगित करावी लागली. यामुळे करोना संकट आणि चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टंचाईग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडुन पिककर्जाचे पुर्नगठन करुन समान पाच हप्त्यात रुपांतर केले जाते. खरीप हंगामासाठी नवीन पिक कर्जाचे वितरण करताना या रुपांतरीत कर्जाचे शेतकऱ्यांनी नियमित परतफेड केल्यास पहिल्या वर्षाचे संपुर्ण व्याज व पुढील चार हप्त्यांचे निम्मे व्याज शासनाकडुन देण्याबाबतचा निर्णय यापुर्वी घेण्यात आला होता. मात्र याकडे दुर्लक्ष करुन जिल्हा बॅंकेने सरसकट व्याजाची आकारणी सुरु केली होती.
या संदर्भात गणेश साखर कारखान्याचे संचालक जालिंदर निर्मळ, पिंप्री निर्मळ सेवा संस्थेचे संचालक भाऊसाहेब घोरपडे आदि शेतकऱ्यांनी आ.विखे पाटील यांची भेट घेवून कर्जदार शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत लक्ष वेधल होते. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबतचे निवेदन आ. विखे पाटील यांना देवून या व्याजाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबतची मागणी केली होती.
या प्रश्नाबाबत आ. विखे पाटील यांनी जिल्हा सहकारी बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधुन शासन निर्देशाप्रमाणेच व्याजाची आकारणी करावी अशी सुचना केली.यानंतर बॅंकेनेही रुपांतरीत कर्जाच्या हप्त्यांचे व्याज आकारणीस स्थगिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन, तातडीने झालेल्या या कार्यवाहीबाबत शेतकऱ्यांनी समाधानही व्यक्त केले.
जिल्हा बॅंकेच्या राहाता तालुक्याचे तालुका विकास अधिकारी गुळवे यांनीही शासन नियमाप्रमाणे पुर्नगठीत कर्जाच्या हप्त्यांच्या व्याज आकारणीस स्थगिती दिली असुन शेतकऱ्यांना रुपांतरीत कर्जाच्या मुद्दलाची रक्कम भरावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.