नवी दिल्ली : जपानमध्ये अडलेल्या जहाजावर कोरोनाची बाधा झालल्या 16 भारतीयांना त्या देशात उपचार करुन बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे ते भारतात परत आले आहेत, अशी माहिती सरकारच्या वतीने आज राज्यसभेत देण्यात आली.
या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन म्हणाले, 132 कर्मचाऱ्यांसह त्या जहाजावर 138 भारतीय डायमंड प्रिन्स या जहाजावर होते. त्यातील 119 भारतीयांना विशेष विमानाने भारताता 27 फेब्रुवारीला आणण्यात आले. त्यानंतर त्यांना हरियाणातील मनेसर येथे भारतीय लष्कराने उभारलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
16 भारतीयांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. जहाजावर जपानने निर्माण केलेल्या वैद्यकीय सुविधेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्यावर उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते भारतात आले. तीन भारतीयांनी तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना जाहजामध्ये उभारलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, असे मुरलीधरन यांनी स्पष्ट केले.