पुणे – लॉकडाऊन संपल्यानंतर विमान कंपन्या प्रवासाच्या वेळी मर्यादित प्रवासी घेणार आहेत. त्याचबरोबर विमानात जेवण देण्यात येणार नाही. तीन आठवड्याच्या लॉकडाऊनमुळे विमान कंपन्यांची परिस्थिती अतिशय खराब झाली आहे. पुन्हा काम सुरू करतानाही ते मर्यादित प्रमाणात करावे लागणार आहे. याची जाणीव आम्हाला असल्याचे विमान कंपनीने म्हटले आहे.
सुरुवातीला आम्ही विमानाच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी घेऊन जाणार आहोत. प्रत्येक दोन प्रवाशामध्ये एक जागा रिकामी ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वेळोवेळी विमानाचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. जेवण देताना प्रवाशांचा आणि कर्मचाऱ्यांचा जास्त संबंध येतो. यासाठी सुरुवातीचे काही आठवडे तरी जेवणाची आणि खाण्यापिण्याची सेवा बंद ठेवली जाणार असल्याचे इंडिगो या कंपनीने म्हटले आहे. अशा प्रकारच्या मर्यादीत सेवेमुळे आम्हाला कसलाही नफा होणार नाही. मात्र, खेळते भांडवल उपलब्ध व्हावे आणि कंपन्यांचे कामकाज चालू रहावे यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.