नवी दिल्ली – देशात सध्या भावनिक मुद्द्यांचा राजकीयदृष्ट्या “दुरुपयोग” केला जात असून त्यातून देशातील जनतेचा “विश्वासघात” करून खर्या मुद्द्यांपासून त्यांचे लक्ष विचलीत केले जात आहे असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त एक्सवरील हिंदीतील एका पोस्टमध्ये, राहुल गांधींनी स्वामी विवेकानंदांचे विचार स्मरणात ठेवून आचारण करण्याची गरज व्यक्त केली. स्वामी विवेकानंदांनी तरुणांची ऊर्जा समृद्ध देशाचा आधार मानली आणि पीडित आणि गरीबांची सेवा ही सर्वात मोठी तपश्चर्या मानली असे ते म्हणाले.
आपल्या स्वप्नांच्या भारताची ओळख काय असेल याचा विचार तरुणांना करावा लागेल, जीवनाचा दर्जा की फक्त भावना? भडकाऊ घोषणा देणारे तरुण की नोकरदार तरुण? प्रेम की द्वेष? यातून तरूणांना योग्य ते निवडावे लागेल असे ते म्हणाले. आज खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवून भावनिक मुद्द्यांचा राजकीय दुरुपयोग केला जात आहे, हा देशाच्या जनतेचा विश्वासघात आहे, असे ते म्हणाले.
आज वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या काळात, तरुण आणि गरीब लोक शिक्षणासाठी, उपजीविकेसाठी आणि वैद्यकीय मदतीसाठी दु:खाच्या ओझ्याखाली दबले जात आहेत,पण सरकार त्याला ‘अमृत काळ’ म्हणत उत्सव साजरा करत आहे, असा आरोप त्यांनी केला. सत्तेच्या गर्विष्ठतेच्या नशेत असलेला सम्राट जमिनीच्या वास्तवापासून खूप दूर आहे अशा शब्दात त्यांनी मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
म्हणूनच या अन्यायाच्या वादळात न्यायाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी, स्वामी विवेकानंदजींच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन, न्याय मिळेपर्यंत करोडो तरुण ‘न्याय योद्धा’ माझ्या या संघर्षात सामील होत आहेत. सत्याचा विजय होईल, न्यायाचा विजय होईल!असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधी १४ जानेवारी रोजी मणिपूर येथून भारत जोडो न्याय यात्रा सुरू करत आहेत.