भाष्य (श्रीपाद शिंदे) – जगभरात उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल क्राइम सिटी अशी होऊ लागली आहे. टोळीयुद्धातून खून, शस्त्रांच्या धाकाने लूटमार, कंपन्यांमधील कंत्राटावरून वाद, शाळा-महाविद्यालयातील हाणामारी, भुरटी भाईगिरी, वाहतुकीचा खोळंबा, अतिक्रमण अशा एक ना अनेक समस्यांनी शहराचे आरोग्य बिघडत आहे. स्ट्रीट क्राइम रेट वाढू लागला असून पोलिसांचा गुन्हेगारी आणि गुन्हेगारांवरील अंकुश मात्र ढळू लागला आहे. या वाढत्या गुन्हेगारीने पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले आहेत.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सराईतचा खून झाला होता. त्यानंतर त्याचे पडसाद थेट चिंचवड परिसरात उमटले आणि 17 जणांच्या टोळक्याने भर दिवसा खून केला. यामुळे चिंचवड परिसर भीतीने हादरून गेला. मागील वर्षी 80 खून झाले. खुनाच्या प्रयत्नाचे 115 गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षभरात दरोड्याचे 52 गुन्हे दाखल आहेत. त्यातील तीन दरोड्यांचा उलगडा पोलिसांना होईना.
जबरी चोरीच्या घटनांमध्ये मागील वर्षी वाढ झाली. सन 2021 च्या (355) तुलनेत सन 2022 मध्ये (461) 106 जबरी चोरीचे अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातच आणखी गंभीर बाब अशी की जबरी चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण 58 टक्के एवढे आहे. घरफोडी आणि वाहन चोरीच्या बाबत देखील परिस्थिती दयनीय आहे. मागील वर्षभरात 446 घरफोड्या झाल्या. त्यातील अवघे 30 टक्के गुन्हे उघडकीस आले. तर 1590 वाहने चोरीला गेली असून त्यातील अवघी 365 वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. सन 2022 मध्ये 12 हजार 869 गुन्हे दाखल झाले असून सन 2021 च्या तुलनेत हे गुन्हे 2 हजार 402 एवढे अधिक आहेत.
एवढी पथके करतात तरी काय?
शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय सुरू झाल्यानंतर अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा वावर शहरात वाढला. पूर्वी एक पोलीस उप आयुक्त आणि एकच गुन्हे शाखा शहरावर नियंत्रण ठेऊन होती. आता गुन्हे शाखांची संख्या पाच झाली. सोबत खंडणी, दरोडा, शस्त्र, अनैतिक मानवी वाहतूकविरोधी, गुंडा विरोधी, अंमली पदार्थ विरोधी अशी भरमसाठ पथके तयार झाली. गुन्हे शाखांची डझनावर पथके तयार झाली तरी एखादे पथक वगळता इतर सर्व पथके नेमक्या काय कारवाया करतात, हे समजणे दुरापास्त झाले आहे. वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांच्या कामगिरीबाबत विचारले असता दरवेळी एकच उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिले जाते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन आहे. मनुष्यबळ कमी आहे. पोलिसांकडे सुस्थितीतील वाहने देखील नाहीत. सायबर गुन्ह्यांसाठी आधुनिक यंत्रणा नाही, अशी उत्तरे एव्हाना पिंपरी-चिंचवडकरांना तोंडपाठ झाली आहेत. परंतु पोलिसांकडे कमतरता आहे म्हणून गुन्हेगार गुन्हे करणे थांबवत नाहीत.
स्वयंघोषित भाईगिरी
स्वयंघोषित भाईगिरी पोलिसांची डोकेदुखी बनू लागली आहे. मला भाई म्हणा, अशी गळ घालत अनेकांना मारहाण आणि लुटण्याचे प्रकार झाले आहेत. भाई म्हणावे म्हणून दहशत पसरविल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचे प्रकारही आयुक्तालयाच्या हद्दीत वारंवार घडत आहेत. शाळा कॉलेजात होणारी हाणामारी देखील गंभीर रूप घेऊ लागली आहे. सहजपणे कुठेही अवैध रित्या मिळणारी दारु, वाइन शॉपच्या आसपास करुन दिली जाणारी पिण्याची व्यवस्था या स्वयंघोषित भाईंची नशा आणि नशेतून हिम्मत वाढविताना दिसून येत आहे.