पिंपरी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदल करण्यात आले आहेत. या बदल्यामध्ये शहरातील बहुतांश पोलीस अधिकार्यांची बदली नागपूरला करण्यात आली आहे. तर नागपूरचे बहुतांशी पोलीस निरीक्षकांची बदली पिंपरी चिंचवडला करण्यात आली आहे. बदल्यांमध्ये साटेलोटे करून पोलिसांच्या बदल्यांमध्ये नागपूर कनेक्शन काय ? याची सध्या जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
राममंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर देशाचा दोन महिन्यांकरिताचा अंतरिम अर्थसंकल्प गुरुवारी (दि.1) लोकसभेत सादर झाला. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत लोकसभेची निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. देश आणि राज्यासाठी या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाच्या असणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगासोबतच राजकीय नेतेदेखील कामाला लागले आहेत. निवडणुकीत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आपल्या मर्जीतील अधिकारी आपल्या बालेकिल्ल्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या काही वर्षांत नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागाचा कारभार आहे. त्यामुळे नागपूर पोलीस दलात चांगले अधिकारी यावेत, यासाठी ते प्रयत्नशील असतात. तर पुणे जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थात अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात होता. सत्तेत असताना पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या मान्यतेशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांसह महसूल खात्यातील अतिवरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या होत नव्हत्या.
मात्र गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या परिसरात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. आगामी काळात संपूर्ण पुणे जिल्ह्यावर भाजपचे वर्चस्व असावे, यासाठी व्युहरचना आखली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागपूरला भाजपच्या मर्जीतील बहुतांश पोलीस अधिकार्यांची बदली पिंपरी चिंचवडला करण्यात आली आहे. या शहराची राजकीय स्थिती पाहता, या शहरात भाजपचे दोन विद्यमान आमदार आहेत. तसेच पोलीस आयुक्तालयात येत असलेल्या पिंपरी, मावळ आणि खेड विधासभा मतदार संघात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. या दोन्ही ठिकाणी लोकसभेत महायुतीचाच उमेदवार निवडून यावा, यासाठी ही रणनिती आखली जात असल्याचे बोलले जाते.
मर्जीतील अधिकार्यांना केले ‘सेफ’
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पोलीस अधिकार्यांना आयुक्तालयात तीन वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ झाला आहे, अशांची बदली करण्यात येते. मात्र ते अधिकारी जर साइड ब्रॅन्चला असतील तर त्यांची बदली केली जात नाही. कायद्यातील याच तरतुदीचा फायदा घेत मर्जीतील काही पोलीस अधिकार्यांची बदली आयुक्तालयातील गुन्हे शाखेत केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकषात हे अधिकारी आल्याने त्यांची बदली झाली नसल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.