पिंपळे गुरव – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने रस्त्यांच्या कडेला स्मार्ट पदपथ निर्माण केले आहेत. या पदपथांवर ठराविक अंतराने झाडे लावली आहेत. परंतु या झाडांना वेळेत पाणी मिळत नसल्याने ती सुकून चालली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने जाणीवपूर्वक शहरातील वृक्षसंपदा जपावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
उद्यान विभागाने चार वर्षांपूर्वी तत्कालीन अधीक्षक गोरखनाथ गोसावी यांच्या माध्यमातून लांडेवाडी ते शांतीनगरकडे जाणार्या मार्गावरील पदपथावर एस ब्लॉकमध्ये झाडे लावली आहेत. सात ते आठ फूट उंच झाडे पाण्याअभावी जळाली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे जळून चालली आहेत. खड्डे रिकामे झाले आहेत. एका बाजूला पालिका पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हजारो झाडे लावण्याचा दिखावा करते.
दुसर्या बाजूला पालिकेचाच उद्यान विभागाला झाडांना पाणी घालण्यासाठी वेळ मिळत नाही. रस्ता दुभाजकामधील शोभेची झाडे मरण यातना भोगत आहेत. उद्यान विभाग याकडे लक्ष देत नाही, असा आरोप अण्णा जोगदंड यांनी केला आहे. मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने दिलेल्या निवदेनावर शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, महिला शहराध्यक्षा मीना करंजावणे, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, रवी भेंकी, सचिव गजानन धाराशिवकर, अॅड. सचिन काळे, राहुल शेंडगे, पंडित वनसकर यांच्या सह्या आहेत.
नागरिकांना नियम, कर्मचारी मोकाट
शहरातील नागरिकांना जर आपल्या प्रांगणातील अडथळा ठरत असलेले झाड तोडायचे असेल तर उद्यान विभाग अनेक अटी घालत असते. पर्यायी झाड लावण्याचा आग्रह ही धरते आणि त्या अटी पूर्ण केल्यानंतरच झाड तोडण्याची परवानगी देते. मग उद्यान विभागाची संबंधित कर्मचारी पाणी न दिल्यामुळे झाड जळते याला जबाबदार कोण? हाच नियम अधिकार्यांना का लागू होत नाही. कर्तव्यात कसूर केल्यामुळे संबंधित अधिकार्याला जबाबदार धरून त्यांच्यावर पण सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कार्यवाही करण्याचे धाडस उद्यान अधीक्षक, पालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उद्यान उपायुक्त रविकिरण घोडके दाखवतील काय? असा प्रश्न निवेदन देताना मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष जोगदंड यांनी केला आहे.