सोमाटणे ( ब. रा. पाटील ) – पिंपरी चिंचवड शहरातच नव्हे तर संपूर्ण जगातच अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षभरात ११ मुले व २० अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केली आहे. त्याध्ये अभ्यासाच्या ताणतणावातून १० जणांनी, आजारपणाला कंटाळून एकाने, रागातून तीन जणांनी आणि प्रेमप्रकरणासह इतर कारणांमुळे १७ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे.
पालकांच्या मुलांकडून अनेक अपेक्षा असतात. आपल्या अपेक्षांचे ओझे ते मुलावर लादतात. मुलाने शाळेसह खासगी शिकवणीचा अभ्यास करावा. विविध कला त्याने आत्मसात कराव्यात, यासाठी पालक जिवाचा आटापिटा करतात. पालकांचे अपेक्षांचे ओझे आणि मुलांच्या मनातील भिती यामुळे नैराश्य भावनांचा ताबा घेते. पालकांच्या अपेक्षाला नकार कसा देऊ? अशी एक ना अनेक अडचणी मुलांच्या मनात घर करतात. त्यातून ते आत्महत्येकडे वळतात.
संवाद साधण्याची गरज
मुले एकटे राहत असतील, एकाच गोष्टीत रमत असतील,जेवण व्यवस्थित करत नसतील,सतत ताणतणावात असतील, नेहमी चिडचिड त्रागा करीत असतील तर अशा परिस्थितीत पालकांनी त्यांच्याशी त्यांचा मित्र बनून संवाद साधणे गरजेचे आहे. जर असे झाले नाही तर मुल हातचे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर पश्चाताप करण्यापलीकडे पालकांच्या हातात काहीच उरत नाही.
एक ना अनेक क्लासेस
अल्पवयीन मुलांवर अभ्यासाचे मोठे ओझे असते. शालेय अभ्यासक्रमासह खासगी अभ्यासक्रमावर भर दिला जातो. शिवाय इतर विविध प्रकारचे क्लासेस उदाणार्थ नृत्य, गायन, वादन, खेळ, असे जादा वर्ग लावले जातात.
अभ्यासाचे टेन्शन
वर्गात मुलाचा पहिला क्रमांक यावा, त्याला अधिकाधिक गुण मिळावेत यासाठी पालकांचा आग्रह असतो. गुण किती आहेत हे महत्वाचे नसून ते बाकीच्या मुलांपेक्षा जास्त आहेत का हे महत्वाचे आहे असे पालकांना वाटते.याचा ताण मुलांच्या मनावर येतो
अगदी कमी वयातील मुलांकडून पालकांच्या अवास्तव अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे मुले नैराश्याकडे झुकतात
– डॉ. शाळीग्राम भंडारी, शिक्षण समुपदेशक
कमी वयात लैगिक आकर्षण, अवाजवी खर्च करण्याची सवय, स्पर्धा, पालक वेळ देऊ शकत नाहीत, याची खंत असते. यामध्ये हरवत चाललेला संवाद यांचा यात समावेश आहे.
– राजेश गायकवाड, शिक्षण तज्ञ
मुलांच्या संगतीकडै पालकांनी लक्ष दिले पाहिजे. मुलाचं रोजच्यापेक्षा वेगळ वागणे पालकांच्या लक्षात कधी येते यावर बरच अवलंबून असते. कोणताही व्यक्ती एकापेक्षा जास्त गोष्टीत पारंगत असत नाही. त्यामुळे त्यांच्या आवडीचे काम त्यांना करू द्या.
– कृष्णदेव खराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिरगाव पोलीस ठाणे.