पहिल्याच दिवशी कुंजीरवाडी परिसरात सर्वेक्षणाचा खेळखंडोबा : शिक्षकांनाच आला अनुभव
थेऊर – मराठा समाजाच्या आरक्षण सर्व्हेक्षणात पूर्व हवेलीतील महसूल खाते मोठा अडथळा ठरत असल्याचा अनुभव दस्तुरखुद्द शिक्षकांना आला आहे. सर्व्हेक्षणाच्या पहिल्याच दिवशी (२३ जानेवारी) महसूल खात्याच्या अकार्यक्षमतेमुळे श्रीगणेशा झालाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
केंद्र कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील प्राथमिक व माध्यमिकच्या ३३ शिक्षकांची नेमणूक कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची व नायगाव या गावांसाठी झाली आहे; मात्र कुंजीरवाडी येथील तलाठी कार्यालयातून संबंधित शिक्षकांना साहित्याचे वाटपच न झाल्याने पाहिल्याच दिवशी आरक्षणाच्या सर्व्हेक्षणाचा कुंजीरवाडी व परिसरात ‘खेळखंडोबा’ झाला आहे.
मराठा समाज आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईत धडक देण्यासाठी आगेकूच करीत असल्याने शासनाला धडकी भरली आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदीचा शोध घेण्यासाठी संबंधितांना उच्चस्तरीय आदेश दिले आहेत. मात्र, अधिकारी वर्ग नोंदी शोधण्यात चालढकल करत असल्याचा आरोप खुद्द मनोज जरांगे यांनी वारंवार केलेला आहे. यामुळे काही मंत्री महोदय व शिष्ट मंडळ तोंडावर आपटले आहे. एवढे होऊनसुद्धा हवेलीतील मराठा आरक्षणाच्या सर्व्हेक्षणाचे काम करणा-या शिक्षकांना महसूल विभागाकडून मदतच मिळत नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
साहित्य नाही, तर सर्वेक्षण कसे होणार
पूर्व हवेलीतील एका शिक्षकाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, २३ ते ३१ जानेवारी दरम्यान सर्व्हेक्षण करण्याबाबत महसूल अधिकारी व शिक्षक यांचे रविवारी (दि. २२) उरुळीकांचन येथे ट्रेनिंग झाले. कुंजीरवाडी येथील तलाठी कार्यालयातून २३ जानेवारीला सकाळी दहा वाजता सर्व साहित्य शिक्षकांना देण्यात येईल, असे सांगितले. त्यानुसार कोरे कागद, मार्कर पेन, ग्रामपंचायत वॉर्डनुसार भाग याद्या, प्रश्नावलीतील १८२ प्रश्नांची यादी व ईतर साहित्य शिक्षकांना मिळणार होते. मात्र, तलाठी कार्यालयातून साहित्य व माहिती न मिळाल्याने आरक्षणाबाबतच्या सर्व्हेक्षणाचा पूर्व हवेलीत शुभारंभच न झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
सर्वेक्षणाचे काम पूर्ण कसे होणार?
पुणे शहरालगतच्या हवेली तालुक्यातील पूर्व भागात सर्व्हेक्षणाची ही परिस्थिती आहे, तर तर जिल्ह्यातील डोंगरी व दुर्गम भागात काय परिस्थिती होणार याविषयी न बोललेलेच बरे, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. आठवडाभरात सर्व्हेक्षणाचं एवढं मोठं काम कसं पूर्ण होणार? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.