पिंपरी – आळंदी-देहू मार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत. लहान मोठे अपघात तर नित्याचेच झाले आहेत. परंतु मागील काही महिन्यांत या मार्गावर अनेकांना अपला जीव गमवावा लागला आहे. अजून किती नागरिकांचा जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन जागे होणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
देहूकडून मोशीकडे जाताना डायमंड चौकात सोमवारी (दि. 22) सकाळी दहा वाजता पपाबाई सदाशिव गवारे (वय 78) रा. हनुमान मंदिरासमोर, मोईगाव, ता. खेड, जि. पुणे. यांना हायवा ट्रक क्र. एम. एच. 14/ के. क्यू./7284 चे चालक सुखशांत व्यक्टराव कांबळे (वय 34, रा. मोशी) यांनी मागील मयत गवारे यांच्या अंगावर मागील चाक घालून गंभीर जखमी केले. त्यात गवारे यांचा मृत्यू झाला. वाहनचालक तेथे न थांबता निघून गेला. मागील काही महिन्यांपूर्वी देखील याच चौकात अपघात घडला होता. तर मोई चौकात देखील सातत्याने लहान मोठे अपघात घडत आहेत. परंतु महापालिका प्रशासन व वाहतूक नियमन करणारे पोलीस यावर काही उपाययोजना करणार आहेत की फक्त बघ्याचीच भूमिका घेणार आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
आळंदी-देहू मार्ग मुळातच अरुंद आहे. त्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. येथील बहुतांश व्यावसायिकांकडे येणार्या ग्राहकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावर वाहने पार्क करत आहेत. त्यामुळे दोन लेनचा असणारा रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे सत्र सुरू आहे.
महापालिकेकडून केवळ आश्वासने
तळवडे चौक, त्रिवेणीनगर चौक, स्पाइन रोड, मोई फाटा येथील डायमंड चौक, पिंपरी-चिखली बीआरटी मार्ग आदी ठिकाणी सातत्याने अपघाताच्या घटना घडत असून त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जेव्हा अपघात घडतो तेव्हा वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासन केवळ शोक व्यक्त करून येथे त्वरित उपाययोजना करण्यात येतील असे सांगून तात्पुरत्या स्वरुपात काही तरी करून पुन्हा नागरिकांना विसर पडला की परिस्थिती जैसे-थे. त्यामुळे महापालिका प्रशासनावर विश्वास ठेवावा, की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तळवडे चौकात अजून उपाययोजना नाही
तळेवडे चौकात मागील महिन्यात एका महिलेला गॅसच्या गाडी धडकून अपघात झाला. तेव्हा तिचा जीव गेला तर त्रिवेणीनगर चौकात एका व्यक्तीचा जीव गेला तेव्हा पोलीस आणि महापालिका प्रशासनाने येथे गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग, अवजड वाहतुकीला काही वेळेत बंदी अशी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते परंतु घटना घडून कित्येक दिवस उलटले परंतु अद्याप उपाययोजना होताना दिसून येत नाही.
अवजड वाहतुकीकडे पोलिसांचा कानाडोळा
देहू-आळंदी मार्ग अंतर्गत मार्गावर सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ अवजड वाहतुकीला बंदी आहे. असे असताना शहरातील बहुतांश भागात अवजड वाहतूक राजरोजसपणे सुरू आहे. याला कुणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. अवजड वाहतुकीवर नियंत्रण ठेवले असते तर डायमंड चौकात एका महिलेचा जीव गेला नसता.
चिखली परिसरात रस्ते अरुंद आहेत. मोईवरून सातत्याने मोठमोठे डंपर, भंगार व्यावसायिकांची अवजड वाहने येथून ये-जा करतात. तसेच कंपनीत जाणार्या मोठ्या गाड्या या अरुंद मार्गावरून जात असल्याने दुचाकींना अपघात घडत आहेत. अवजड वाहतुकीसाठी पर्याय मार्ग काढणे गरजेचे आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
– ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन.