पिंपरी – काही दिवसांपूर्वी शहरात एका सराईताचा खून झाला. सुमारे 14 ते 15 जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत खून केला. यातही अल्पवयीनही होतेच. दहशत पसरविण्यासाठी हवेत गोळीबारही केला. काही तासातच यापैकी काही आरोपींना पोलिसांनी गजाआड केले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी या गुंडांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी अनेक तरुणांनी न्यायालयात गर्दी केली. ही गर्दी पाहून तिथे उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यात अनेक अल्पवयीन मुले आणि नवतरुण होते. गुंड आणि गुन्हेगारीचे हे वाढते आकर्षण समाजासाठी धोक्याची घंटा आहे. ही घटना ताजी असतानाच सराईत गुंडांकडून गजबजलेल्या परिसरात भर दिवसा तीन ठिकाणी गोळीबार करतात. एकीकडे या गुंडांमुळे आणि त्यांच्या दहशतीमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे तर दुसरीकडे या गुंडांच्या गुंडगिरीचे किस्से रंगवून सांगणारे आणि ऐकणारे तरुणही खूप आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात अनेक परिचित-अपरिचित लहान-मोठ्या टोळ्या आहेत. या टोळ्या कधी वर्चस्वासाठी, कधी खुन्नस दिली म्हणून तर कधी इतर कुठल्या तरी क्षुल्लक कारणाने एकमेकांना भिडतात. यापैकी बहुतेक वेळा विषय कुणाच्या तरी मध्यस्थीने मिटतो, तर कधी तात्पुरता शांत होऊन योग्य वेळीच्या प्रतिक्षेत धगधगत राहतो. अनेकदा ही लहान-मोठी भांडणे पोलिसांपर्यंतही पोहचतात. परंतु ही मुले कमी वयाची किंवा नुकतीच तारुण्यात आलेली असल्याने, तसेच त्यांच्यावर कोणतेही गुन्हे नसल्याने त्यांचे आयुष्य खराब होऊ नये, या चांगल्या भावनेने पोलीस यांना समज देऊन, माफीनामा लिहून घेत यांना सोडतात. यापैकी काही सुधारतात तर काही पोलीस आपल्याला काहीच करत नाहीत या गैरसमजातून स्वतःला भाई समजू लागतात.
अद्दल घडविण्याची गरज
गेल्या दोन वर्षांमध्ये शहरात सातत्याने या टोळ्यांकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. या गल्लीछाप स्वयंघोषित भाईंची मजल आता एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत जाऊन पोहचली आहे. सहज उपलब्ध होत असलेल्या पिस्टलमधून हे एकमेकांवर फायरिंग करत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटाप्रमाणे कोयते घेऊन एकमेकांवर तुटून पडत आहेत. अनेकदा हे गुंड दहशत माजविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांवरही हल्ले करुन त्यांना भयभीत करत आहेत. या गुंडांना आता खऱ्या अर्थाने अद्दल घडविण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी अशा गुंडांची धिंड काढत त्यांच्या गुंडगिरीचे पोलिसांनी धंडवडे काढले होते. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. पोलीस अशा गुंडांना अद्दल घडविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कुणीतरी शूटींग करुन सोशल मीडियावर पसरविते आणि पोलिसांवर कारवाईची तलवार टांगली जाते. भयमुक्त समाजासाठी आता पोलिसांना निर्बंधमुक्त करुन या गुंडांना अद्दल घडविण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर आज एकमेकांना मारणारे हे गुंड भविष्यात सर्वसामान्य नागरिकांचेही जीव घेतील. त्यामुळे यांच्या आताच मुसक्या आवळणे गरजेचे झाले आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या गुंडांना पकडून गजाआड केल्यानंतर हे जामिनावर सुटून बाहेर येतात आणि पहिल्यापेक्षा अधिक खतरनाक होतात. यांना अद्दल घडविण्यासाठी पोलिसांना वेगळा विचार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी पोलिसांना राजकीय पाठबळ मिळण्याची आवश्यकता आहे.
गुंडांमुळे सोशल मीडियावर शहर बदनाम
यू ट्युबसारख्या समाजमाध्यमावर पिंपरी-चिंचवड असे टाइप केले असता या उद्योगनगरीतील उद्योग, विकास, ऐतिहासिक वारसा अशा अभिमानास्पद बाबी येणे अपेक्षित आहे. परंतु एकापाठोपाठ एक क्राइम स्टोरी येऊ लागतात. अशाच प्रकारे इंस्टाग्राम, फेसबुक व इतर रील्स प्रदर्शित करणाऱ्या ऍपवर देखील शहरातील तरुणाईकडून गुंडगिरी आणि शिवीगाळेच्या माध्यमातून झालेल्या संस्कारांचे ओंगळवाणे प्रदर्शन होत असते.