नगर – नगर- पाथर्डी, नगर- कोपरगाव या रस्त्यांच्या कामाची स्थिती काय आहे, याची माहिती प्रशासनाकडून घेतल्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाच्या माध्यामातून भाजप व खासदार डॉ. सुजय विखे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असून आ. लंकेंचे हे उपोषण म्हणजे राजकीय स्टंट असल्याचा आरोप भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
मुंढे म्हणाले की, मागील अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात नगर जिल्ह्यासह शेवगाव, पाथर्डी, राहुरीमध्ये एकही रस्त्याला निधी देण्यात आला नाही. आता आपले काम दिसत नाही. म्हणून दुसऱ्यावर आरोप करण्याचा हा राष्ट्रवादीचा धंदा आहे. नगर- पाथर्डी रस्त्याची दोन वेळा निविदा काढावी लागली. पहिल्या व दुसऱ्या ठेकेदाराने निविदा बिलो भरल्याने त्यांना काम करता आले नाही. पहिल्या ठेकेदाराने काम दर्जेदार न केल्याने त्यांचे काम रद्द करण्यात आले. आता दुसऱ्या ठेकेदाराने काम करण्यास असमर्थता दर्शविल्याने पुन्हा तिसऱ्या निविदा काढण्याची प्रक्रिया करावी लागत आहे.
निवदा लवकरच काढण्यात येणार असून एप्रिल-मे मध्ये नगर- पाथर्डी रस्त्याचे काम पूर्ण होईल. 54 किलोमीटर रस्त्यापैकी आठ किलोमीटर रस्त्याचे काम बाकी आहे. ते पूर्ण होईल. ती स्थिती नगर- कोपरगाव रस्त्याची आहे. आता ठेकेदारांनी काम करण्यास असमर्थता दर्शविली किंवा त्यांनी काम करण्यास उशीर केला. यात भाजप व खासदार विखे यांची काय चूक आहे. या ठेकेदारांनी काम पूर्ण करावे यासाठी खा. विखे यांनी प्रयत्न केले. पण त्यात यश आले नाही. रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणीबाबत आ. लंके यांच्याशी प्रशासनाने चर्चा केली आहे. मात्र ते आपली भूमिका सोडण्यास तयार नाही.
त्यामुळे त्यांचे हे आंदोलन हे राजकीय स्टंटबाजीसाठी असल्याचा आरोप करून मुंडे म्हणाले की, या महामार्गाची अवस्था खराब आहे. हे सर्वांना मान्य आहे. ते रस्ते तातडीने दुरुस्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी खा. विखे हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र ठेकेदार काम करीत नाही. त्यामुळे वारंवार निविदा काढावी लागत आहे. त्या सर्व प्रक्रियेचा सोपस्कार पूर्ण करण्यात वेळ जात आहे. मात्र येत्या आठ दिवसात सर्वच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार असून नगर-पाथर्डी रस्ता एप्रिल-मे मध्ये पूर्ण होईल. तर नगर-कोपरगाव रस्ता पुढील वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे. त्याबरोबर नगर-पाथर्डी रस्त्याचे चौपदीकरण करण्याचा प्रस्ताव देखील खा. विखे यांनी दिला असल्याचे मुंढे म्हणाले.