पिंपरी – व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सीईटी प्रवेश प्रक्रियेसाठी फार्मसी सोडून इतर अभ्यासक्रमासाठी तिसरी फेरी पार पडत आली आहे. मात्र, या फेरीतही अनेकांना गुणवत्ता यादीत नाव येऊनही विविध कारणांनी प्रवेश नाकारण्यात येत आहे. तसेच इन्स्टिट्यूशनल राऊडमध्ये लाखोंच्या घरात डोनेशन मागितले जात आहे. त्यामुळे शिक्षणाचा जणू काही बाजारच सुरू असल्याचे चित्र शहरातील काही खासगी शिक्षण संस्थांमध्ये दिसून येत आहे.
बारावीच्या परीक्षेचा निकाल लागून सहा महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही प्रवेश प्रक्रिया पार पडलेली नाही. तर, फार्मसीची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्षातील सहा महिने प्रवेश प्रक्रियेतच गेले आहेत. त्यामुळे ज्यांना प्रवेश मिळणार नाही, अशांचे वर्ष वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांला सीईटी परीक्षेत 116 गुण मिळाल्यानंतर तिसऱ्या यादीत नंबर लागतो. मात्र, प्रवेश पूर्ण झाल्याचे सांगत संबंधित महाविद्यालयाने प्रवेश नाकारला. त्यामुळे एवढे गुण मिळवूनही प्रवेश मिळत नाही. तसेच इन्स्टिट्यूशनल फेरीत राखीव कोठ्यातून प्रवेश घ्यायचा असेल तर, त्यासाठी लाखो रुपये मोजण्याची विद्यार्थी व पालकांना तयारी ठेवावी लागत आहे. वर्ष वाया जाऊ नये म्हणून काही पालक पैसे भरूही प्रवेश घेत आहेत. तर, काहीजण पुन्हा पुढच्या वर्षी प्रयत्न करू असे म्हणत निराश होऊन जाताना दिसत आहेत.
सीईटी सेल दखल घेईल का?
तिसऱ्या फेरीतही अनेक विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे. तसेच इन्स्टिट्यूशनल फेरीत महाविद्यालयाचे मॅनेजमेंट लाखो रुपयांत मागणी करत आहेत. त्यामुळे सर्व प्रवेश यंत्रणा सेंट्रलाईज झाली असली तरी, विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात आहे. तसेच लाखो रुपये भरल्यावर काही ठिकाणी प्रवेश दिला जात आहे. याची सीईटी सेट दखल घेईल का?, असे पालकांचे
म्हणणे आहे.
प्रवेशासाठी लाखोंची मागणी
प्रवेश देण्यासाठी काही जागा या महाविद्यालयाकडे राखीव असतात. त्या जागांवर कोणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय महाविद्यालयाचे मॅनेजमेंट घेते. त्या जागांसाठी कमी गुण मिळालेले विद्यार्थी आधीच ऍडव्हान्स देऊन आपले बुकिंग करून ठेवतात. तेथे मॅनेजमेंट म्हणेल तेवढे पैसे दिले जातात. काही विद्यार्थी वर्ष वाया जाऊ नये म्हणून आम्ही पैसे भरतो, पण प्रवेश द्या, असे म्हणत आहेत. तेथेही पहिला प्रवेश रद्द झाल्यास प्रवेश मिळेल, असे सांगण्यात येत आहे.
नियमित अभ्यासक्रमाची मुदत वाढवावी लागेल
व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नाही, तर नाइलाजास्तव विद्यार्थ्यांना वर्ष वाया जाऊ नये म्हणून नियमित अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो. महाविद्यालयांमध्ये नियमित अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाची अंतिम मुदत 31 नोव्हेंबरपर्यंत होती. नंतर ती 10 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्या काळात प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाची प्रवेश फी भरून प्रवेश घेता येतो. तसेच उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची हमी दिली जात नाही. मात्र, काही वेळेस विशेष केस म्हणून त्याकडे पाहिले जाते.