पिंपरी – काळेवाडी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज (एमएम) चौक दरम्यान विद्युत पुरवठा वाहिनी भूमिगत करण्यात आलेली नाही. त्यामुळे महावितरणकडून या वाहिनीला अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांची वारंवार छाटणी केली जात आहे. याचा वृक्षप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात असून, ही वाहिनी भूमिगत करण्याची मागणी होत आहे.
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता बीआरटी मार्ग विकसित करण्यात आला. त्यावेळी मार्गाच्या दोन्ही बाजूला नियमानुसार झाडे लावण्यात आली. त्यातील काही जगली, काही जळाली किंवा तोडण्यात आली. जी झाडे जगली त्यांची वाढ झाली आहेत. मात्र, महावितरणची विद्युत पुरवठा वाहिनी भूमिगत न केल्याने या फांद्यांवर वारंवार कुऱ्हाड कोसळत आहे.
बीआरटी मार्ग तयार करताना विद्युत पुरवठा वाहिनीसाठी पदपथाखाली डक्ट तयार करणे गरजेचे होते. जेणेकरुन वाहिनी सुरक्षित राहिली असती. मात्र, ही वाहिनी भूमिगत न करता रस्ता विकसित करण्यात आला. झाडेही लावण्यात आली. कालांतराने झाडे वाढल्यानंतर फांद्या विद्युत वाहिनीच्या तारांना त्रासदायक ठरू लागल्या. त्यामुळे महावितरण वारंवार वाढलेल्या फांद्या तोडल्या जात आहेत. महापालिका व महावितरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे झाडांचे मरण होत आहे.
दुकानांसमोरील झाडांची कत्तल
बीआरटी मार्गाच्या दोन्ही बाजूला नियमानुसार वड, पिंपळ, कडूलिंब आदी झाडे लावली होती. मात्र, बाजूच्या दुकानांचे फलक दिसण्यासाठी अनेक झाडे तोडण्यात आली. जी झाडे जगली आहेत, त्यांच्या फांद्या सातत्याने तोडल्या जात आहेत.
बीआरटी मार्गावर येणाऱ्या विद्युत यंत्रणेबाबत महावितरणकडून अंदाजपत्रक तयार करून ते महापालिकेला सादर केले आहे. त्यासंदर्भात पुढील कार्यवाही महापालिकेने करणे आवश्यक आहे.
– निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण
या प्रकाराबद्दल उद्यान विभागाकडून सविस्तर माहिती घेणार आहे. त्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.