औंध – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील महायुतीचे सरकार सुरवातीपासून सकारात्मक होते. आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा करून मार्ग काढण्यात यश मिळवले. मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द राज्यातील महायुती सरकारने खरा केला आहे. मी देखील पहिल्यापासून आरक्षण मिळाले पाहिजे या विचाराचा होतो. अनेकदा हे बोलून दाखवले होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.
येथील शिक्षण मंडळाच्यावतीने सर्व शाळांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. औंध येथील श्रीयमाई श्रीनिवास विद्यालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या चेअरमन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, विश्वस्त हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, प्रशांत खैरमोडे, अँड. अतुल क्षीरसागर, श्रीधर कंग्राळकर, सचिव प्रदीप कणसे, सहसचिव संजय निकम, दीपक कर्पे, प्राचार्या डॉ. शकुंतला सावंत, सदाशिव घाडगे, सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अजित पवार म्हणाले की औंधसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण मंडळाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे.
सातत्याने नवनवीन उपक्रम सुरू करण्यावर संस्थेचा भर असतो. शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेच्या सर्वच शाळांची रंगरंगोटी करून सुशोभिकरण करण्यात येईल. संस्थेच्यावतीने सुरू असलेल्या इंग्लिश मिडीयम शाळेच्या सुसज्ज इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच इमारत पूर्ण करून उद्घाटन होईल. पुढील शैक्षणिक वर्षात इंग्लिश मिडीयम शाळा नवीन इमारतीत सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाळेने दर्जा आणि गुणवत्ता राखून आपले वेगळेपण सिद्ध करावे.
गुणवत्तेवर आधारित कौशल्य विकास कार्यक्रम राबवला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कलाप्रेमी राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी संगीत, नाट्य, कला, क्रीडा, साहित्य क्षेत्राला राजाश्रय दिला. त्यांचा लोकनियुक्त राज्यपध्दतीकडे ओढा होता. त्यांच्या दुरदृष्टीमुळे साने गुरुजी, ग. दि. माडगुळकर, शंकरराव खरात, शंतनु किर्लोस्कर यांच्यासारखी रत्ने या मातीत घडली. ही शिक्षण मंडळाच्यादृष्टीने अतिशय गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
125 वर्षाच्या श्री श्री विद्यालयाच्या जुन्या इमारतींचे पूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी इमारतीची पाहणी केली. त्याचबरोबर ग्रंथदिंडीचा शुभारंभ केला. श्री श्री विद्यालयाच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, चेअरमन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सचिव प्रदीप कणसे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिक्षण मंडळाचे सभासद, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. प्रमोद राऊत यांनी सूत्रसंचालन केले. सचिन सुकटे यांनी आभार मानले.
ब्रिटीश काळात शाळा काढणे सोपे नव्हते.
इंग्रजांची सत्ता असताना 1896 मध्ये शाळा काढणे आणि चालवणे सोपे नव्हते. मूठभर लोकांच्या हाती शिक्षणाची व्यवस्था होती. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची कवाडे खुली करून शाळा, वस्तीगृह सुरू करुन गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचे काम बाळासाहेब महाराज यांनी केले. औंध शिक्षण मंडळाला देदिप्यमान इतिहास आहे. या शाळेत 125 वर्षाच्या काळात अनेक पिढ्या घडल्या. श्रीयमाई श्री निवास विद्यालयाची वाटचाल गौरवशाली असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
जीवनात मित्र निवडताना काळजी घ्यावी.
जीवनात मित्र महत्वाचे आहेत. मित्र निवडताना काळजी घ्यावी. जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि बरबाद होण्यासाठी मित्रांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे चांगले मित्र निवडा. वाईट संगीतापासून जाणीवपूर्वक दूर राहा. खादाड, पेदाड मित्रांच्या नादी लागू नका, असा सल्ला त्यांनी विद्यार्थी आणि तरुणांना दिला.