पिंपरी – शहरातील नागरिकांच्या जिवीताच्या हमीकरिता अग्निसुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. केवळ व्यापारी व व्यावसायिक आस्थापनांबरोबरच निवासी सोसायट्यांमध्येदेखील या नियमांचे पालन केले पाहिजे. याकडे दुर्लक्ष करणार्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाईबरोबरच गरज भासल्यास आस्थापनांचा पाणीपुरवठा खंडीत करणे अथवा आस्थापना सील करण्याची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. महापालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
पिंपरी-चिंचवड शहरात पूर्णानगर येथील हार्डवेअर दुकान व तळवडे येथील कारखान्यात लागलेल्या आगीत जिवितहानी झाल्याने महापलिका प्रशासनाने शहरातील 40 हजार आस्थापनांचे महिला बचत गटाच्या माध्यमातून सर्वे पूर्ण केला आहे. त्यामध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे एकूण 2400 आस्थापनांना नोटीस बजावली आहे. या आस्थापनांकडून 15 दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे. या खुलाशामध्ये आढळणार्या उणीवा दूर करण्यासाठी या अस्थपनांना वेळ दिला जाईल. मात्र या कालावधीत अग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणार्या आस्थापनांचा पाणीपुरवठा खंडीत करणे अथवा गरज भासल्यास वेळप्रसंगी संबंधित आस्थापना सील केल्या जाणार आहेत.
व्यापारी आस्थापनांमध्ये बेकायदेशीरपणे पोटमाळे बांधून त्यामध्ये कामगारांचे वास्तव्य असल्याची बाब आढळून आली आहे. केवळ व्यापारी व व्यावसायिकांनीच नव्हे तर हौसिंग सोसायटीच्या पदाधिकार्यांनीदेखील आपल्या सोसायटीमधील अग्निसुरक्षा यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही, याची तपासणी करावी. फायर टँकमध्ये पुरेसे पाणी आहे की नाही, स्प्रिंकलर्स योग्यप्रकारे काम करत आहेत की नाही, याची पाहणी करावी. दर सहा महिन्यांनी अग्निसुरक्षा यंत्रणेचे ऑडिट करावे. वेळप्रसंगी खासगी एजन्सीकडून ऑडिट करून घ्यावे. शहरातील नागरिकांना आम्ही जिविताची हमी देत असताना, प्रत्येक नागरिकानेदेखील आपल्या जीवाची खबरदारी घेण्याचे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले.
अग्निशमनमध्ये अधिक उंचीच्या शिड्या
शहरात गगनचुंबी इमारती उभ्या राहत असल्याने, अग्निशामक दलाची जबाबदारी वाढली आहे. आणीबाणीच्या काळात अशा अधिक उंचीच्या इमारतींमधील रहिवाशांची सुटका करणे अथवा आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या ताफ्यात 54 मीटर व 70 मीटर उंचीच्या शिड्या दाखल होत आहेत, अशी माहिती शेखर सिंह यांनी यावेळी दिली.