पिंपरी – शाळांच्या गुणवत्ता वाढीची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता त्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक समितीमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यातूनच शाळांचा दर्जा वाढण्यासोबतच मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल आणि हाच खऱ्या अर्थाने शिक्षणाचा जल्लोष साजरा करण्याचा दिवस असेल, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
“जल्लोष शिक्षणाचा २०२३-२४” या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, आकांक्षा फाउंडेशनच्या जयश्री ओबेरॉय आदी उपस्थित होते.
आयुक्त सिंह म्हणाले, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, कोअर टीम यांनी पालकांना तसेच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जल्लोष शिक्षणाचा हा उपक्रम राबविला तर शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडेल. शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांचे धोरण कायम राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रशासन अधिकारी संजय नाईकडे म्हणाले, शिक्षकांच्या अर्जित रजा, सोयीसुविधा असे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. शिक्षकांनी आता शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. यावर्षी बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक असे तीन विभाग केले आहेत. मूल्यांकनासाठी शाळा सिद्धी हाच पायाभूत घटक आहे. शाळेला अतिरिक्त निधी पुरविण्यात येणार आहे, अशी माहितीही प्रशासन अधिकारी नाईकडे यांनी यावेळी दिली.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता आणि कल्पना प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ तयार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा, कला, हस्तकला, तंत्रज्ञान यासह त्यांच्या कल्पक विचारसरणीला चालना देण्यासाठी मदत मिळत आहे. यातील खरा केंद्रबिंदू जरी विद्यार्थी असला तरी मुख्य घटक शिक्षक आहे.