Amit Shah – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी पश्चिम बंगालमधील बनगाव येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या मतदानात भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. 380 जागांसाठी निवडणूक पूर्ण झाली आहे. बंगालमध्ये 18 जागांसाठी निवडणूक पार पडली आहे. आज मी तुम्हाला सांगतो की, 380 पैकी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 270 जागा घेऊन पूर्ण बहुमत मिळवले आहे. पुढे लढाई 400 पार करायची आहे. रॅलीत आलेल्या लोकांना प्रश्न करत ते म्हणाले, ‘बंगालच्या लोकांनो, तुम्ही 400 पार करणार का? बंगालमध्ये 30 पेक्षा जास्त जागा जिंकवणार का?
42 पैकी 30 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळाव्यात असे बंगालच्या मतदारांना आवाहन करून अमित शाह म्हणाले, ‘ममता दीदी, तुम्ही ईव्हीएम मतदानाद्वारे सत्ता मिळवली तेव्हा तुम्हाला आनंद झाला होता. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून तीन टर्म पूर्ण केलेत, पण आता पराभवाच्या भीतीने तूम्ही त्याच ईव्हीएम मशीनवर आरोप करत आहे. बंगालमध्ये पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पुढचे सरकार स्थापन करेल, असा दावा अमित शहा यांनी केला.
शाह म्हणाले- ममता दीदी खोटं बोलत आहेत…
अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, ममता दीदी खोटे बोलत आहेत की जो कोणी CAA अंतर्गत नागरिकत्वासाठी अर्ज करेल त्याला अडचणींना सामोरे जावे लागेल. शहा म्हणाले, ‘माटुआ समाजातील लोकांना कोणाचीही अडचण होणार नाही, याची ग्वाही देण्यासाठी मी आलो आहे. तुम्हाला नागरिकत्वही मिळेल आणि देशात सन्मानाने जगता येईल. जगातील कोणतीही शक्ती माझ्या निर्वासित बांधवांना भारताचे नागरिक होण्यापासून रोखू शकत नाही, हे नरेंद्र मोदीजींचे वचन आहे.
लक्ष्मी भंडार योजनेत आणखी 100 रुपयांची वाढ करणार –
गृहमंत्री म्हणाले, ‘ममता दीदी म्हणतात की भाजपचे लोक आले तर लक्ष्मी भंडार योजना बंद पाडतील. मी तुम्हाला सांगतोय की भाजप कोणतीही योजना बंद करणार नाही. लक्ष्मी भांडार योजनेत आम्ही आणखी 100 रुपये वाढवू. चिटफंड घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, महापालिका भरती घोटाळा, रेशन घोटाळा, गाय आणि कोळसा तस्कर आणि पैसे घेऊन प्रश्न विचारणाऱ्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी. कुणालाही सोडले जाणार नाही, असे शहा यांनी स्पष्टपणे सांगितले.
‘गाय चोर, कोळसा चोर, नोकरी चोर सगळे तुरुंगात जाणार’ –
अमित शहा म्हणाले, ममता दीदी आणि राहुल बाबा यांना 22 जानेवारी रोजी राम लल्लाच्या अभिषेक प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पण, दोघांनाही त्यांच्या व्होट बँकेची भीती वाटल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. मोदीजींनी बंगालमधील सर्व गरिबांना घरे, शौचालये, 5 किलो तांदूळ आणि 5 लाख रुपयांचा वैद्यकीय विमा दिला आहे. ममता बॅनर्जी म्हणतात की तृणमूल काँग्रेस गरिबांना तांदूळ देत आहे. वास्तविक नरेंद्र मोदी हे तांदूळ पाठवत आहेत. ममता दीदी विचारत आहेत, त्यांना तुरुंगात का पाठवले जात आहे? मला असे म्हणायचे आहे की ही फक्त सुरुवात आहे. गाय चोर, कोळसा चोर, नोकरी चोर आणि प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेणाऱ्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी.