devendra fadnavis | ajit pawar | शरद पवार यांच्यासोबत एकत्र राहून आपल्याला कोणतेही भविष्य नाही हे लक्षात आल्यामुळेच अजित पवार भाजपसोबत आले, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? या प्रश्नाचे उत्तर भाजप संसदीय मंडळ मित्रपक्षांना विश्वासात घेऊन ठरवेल, असेही ते यावेळी म्हणाले.
अजित पवार यांना शरद पवार यांच्यासोबत स्वतःचे अस्तित्व राहिले नव्हते. त्यांना त्यांच्यासोबत कोणते भविष्यही नव्हते. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच भाजपसोबत येण्याची भूमिका घेतली. आता आम्ही महायुती सरकारमध्ये एकत्र आहोत. या सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
विरोधी पक्षांच्या आघाडीकडून मतदारांमध्ये भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. त्यांनी सुरुवातीला दलितांमध्ये संविधान बदलण्याची भीती निर्माण केली. त्यानंतर त्यांनी इतर समाजांमध्येही ही भीती तयार केली. पण त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही.
मी मराठवाड्यातील 8 पैकी 7 ठिकाणी सभा घेतल्या. त्यात काही जिल्ह्यांत जातीय ध्रुवीकरण झाल्याचे दिसून आले. हे ध्रुवीकरण महाराष्ट्रासाठी योग्य नाही. महाराष्ट्रात समाजा-समाजात दुफळी निर्माण होणे ही दुर्दैवी गोष्ट आहे, असेही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंकडे आता मुंबईतील मराठी मतदार फारसा उरला नाही. ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आली आहे. आम्ही वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या जागा वाढल्या.
यामुळे मराठी मतदार भाजपच्या मागे असून, ते मोदींच्या नावाने भाजपला मतदान करतात हे स्पष्ट झाले. हे पाहून उद्धव ठाकरेंनी आता मुस्लिम मतांसाठी पायघड्या घातल्या. सध्या त्यांनी काँग्रेसपेक्षाही अधिक मुस्लिमधार्जिणी भूमिका घेतली आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजप संसदीय मंडळ ठरवणार
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजप संसदीय मंडळ घेणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. भाजपने अनेक राज्यांच्या निवडणुकीत एक महत्त्वाचे सूत्र पाळले.
पक्षाने या राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला नाही. आता महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांना विश्वासात घेऊन आमची संसदीय समिती या प्रकरणी योग्य तो निर्णय घेईल, असे फडणवीस म्हणाले.