करोनासोबतचा लढा : समाजाच्या मानसिकतेत होईना बदल
जाधववाडी – शहरात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याला जाधववाडी परिसरदेखील अपवाद नाही. परंतु या परिसरातील काही करोनामुक्त झालेल्या नागरिकांना समाजाकडून मिळालेल्या वागणुकीमुळे खूप मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्याशी दैनिक प्रभातच्या प्रतिनिधीनी संवाद साधला असता त्यांनी त्यांच्या परिसरातील नागरिकांकडून त्यांना मिळालेल्या वागणुकीविषयी सांगत असताना अक्षरशः डोळ्यांमधून पाणी आले.
करोना या संसर्गजन्य रोगाकडे समाजाचा बघण्याची दृष्टिकोन आजूनही बदलला नाही. आपल्या आवतीभोवती कोणी करोना पॉझिटिव्ह आले तर त्यांच्याकडे व त्यांच्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप विचित्र दिसून येत आहे. त्यांना हीनतेची वागणूक देणे अशा घटना घडत आहेत. परंतु असे झाल्याने करोनामुक्त झालेले नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांचे मानसिक स्वास्थ्य खालावत आहे. त्यांना आपल्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांविषयी कुटुंबाविषयी प्रेम असताना आपण दररोजचे सखेसोबती असताना हीच माणसं आपल्याशी अशी वागतात हे पाहून दुःख होत आहे. करोनातून मुक्त होऊन आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांचे स्वागत करून त्यांचे मनोधैर्य वाढविणे अपेक्षित असताना त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. तेव्हा प्रत्येकाने विचारधारा बदलणे गरजेचे आहे.
करोना हा संसर्गजन्य रोग आहे. काही महिन्यांमध्ये त्याच्यावर लसदेखील येत आहे. तेव्हा या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. ज्याप्रमाणे देशात, राज्यात अथवा आपल्या शहरात एखाद्या नामांकित व्यक्तीला, आमदार, खासदार, सेलिब्रिटी यांना करोना झाला तर आपण त्यांना करोनातून बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि आपल्याच जवळच्या व्यक्तींसोबत असे हीनपणे वागतो. ते योग्य नाही. तेव्हा समाजाने आपला दृष्टिकोन बदलून करोनामुक्तदेखील समाजाचे एक घटक आहेत, ते आपले भाऊबंद आहेत घरातील आहेत, असे समजून त्यांना माणुसकीची वागणूक देणे गरजेचे आहे.
बारा दिवसांपूर्वी मी महापालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या शिबिरात कोविड तपासणी केली. त्यात मी करोना पॉझिटिव्ह आल्याने घरातील सगळ्यांची तपासणी केली. तेही सर्वजण पॉझिटिव्ह आले. आम्हा सर्वांना आकुर्डी येथे विलगीकरण कक्षात ठेवले. पाच दिवसांनी आम्हाला घरी सोडले. परंतु घरी आल्यानंतर परिसरातील नागरिक आमच्याशी वेगळ्याच भावनेने वागू लागले. आम्हाला त्यांच्या वागण्याचा आलेला अनुभव आम्ही कधीही विसरू शकणार आहे. काय गुन्हा आमचा की आम्ही करोनाबाधित झालो. खरंच आपलीच माणसं अशी वागतात तेव्हा विश्वास बसत नाही. खूप दुःख होते.
– एक करोनामुक्त रुग्ण