फलटण – सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकले असून त्यांना मदत करण्याचे आवाहन सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले होते.
मराठा क्रांती मोर्चा फलटण यांच्यावतीने या आवाहनास प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दोन पाऊले पुढे येत त्या पूरग्रस्त लोकांसाठी धान्य, तेल, साखर, गूळ, रवा, तांदूळ तसेच जे लोक मदतकार्य करीत आहेत यांच्यासाठी कोरडा व ताबडतोब तयार खाऊ म्हणून बिस्किटे व फरसाण (शेव चिवडा) देऊन एक सामाजिक बांधिलकी जपली. ही सर्व मदत फलटणचे तहसीलदार हणमंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी मराठा क्रांती
मोर्चाचे सर्व समनव्यक उपस्थित होते. मराठा समाज हा नेहमीच सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होतो तर सर्व समाजाचा मोठा भाऊ म्हणून समाजात वागतो व सर्व समाजातील घटकांना मदतीचा हात देत असतो. यावेळी मात्र सातारा,सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावे आज पुराच्या पाण्यात अडकली असून अनेकांचे संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. मात्र या लोकांना मदत करण्यासाठी राज्य सरकार, सामाजिक संस्था, कार्यकर्ते सर्वोतोपरी मदत करीत आहेत. मात्र आपली ही मदत करण्याची संस्कृती असलेला मराठा समाज आजही कायम सर्वांना मदत करतो व त्याची सर्व जबाबदारीही स्वीकारतो. यामुळे आज शुक्रवारी सकाळी सर्व मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक एकत्र आले व या पूरग्रस्त लोकांना मदत केली.
ही सर्व मदत तहसील कार्यालय येथे पोहोच करून त्या ठिकाणी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात काल सांगली जिल्ह्यातील बोट दुर्घटनेत मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. तसेच सर्व मदत तहसीलदार हणमंत पाटील यांच्याकडे सुपूर्त केली. आवश्यकता भासल्यास अजून मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.