नवी दिल्ली : अयोध्या खटला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आठवड्यातले पाच दिवस सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतू, त्याबद्दल एका मुस्लिम पक्षकाराने आक्षेप नोंदवला. तसेच पाच ऐवजी 3 दिवसच हा खटला चालवण्यात यावा अशी मागणी या पक्षकरांनी केली. दरम्यान, मुस्लिम पक्षकारांनी केलेली ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
या खटल्याच्या सुनावणीच्या चौथ्या दिवशी एका मुस्लिम पक्षकाराच्या वतीने युक्तिवाद करताना ऍड. राजीव धवन यांनी तीन दिवसच खटला चालवण्याची मागणी न्यायालयात केली. तसेच घाईगर्दीने सुनावणी होत असल्याने त्याचा काही वेळा त्रासही होत आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी व शुक्रवारी फक्त नव्या याचिकांची सुनावणी घेण्याची प्रथा आहे. मात्र, ती बाजूला सारून राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी शुक्रवारीही घेण्याचे न्यायालयाने ठरवले आहे. दरम्यान,या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठ करत आहे. दरम्यान, रंजन गोगाई 17 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे या खटल्याची सुनावणी पुर्ण होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती.