मुंबई : मागील काही दिवसांपासून पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचा जोर आता ओसरला आहे. आता पाऊस कमी असून, त्याची तीव्रताही कमी झाली आहे. येथील पावसाची नोंद खालावली आहे. परिणामी आता पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.
गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकण, गोवा, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर ताशी 60 किमी वेगाने वारे वाहतील. समुद्र खवळलेला राहील. मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहनदेखील हवामान खात्याने केले आहे.