पुणे : पु. ल. देशपांडे यांचा 12 जून हा स्मृतिदिन. यानिमित्त दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी पुलंच्या चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, कला क्षेत्रातील द्रष्टेपणावर आधारित “द्रष्टे पु. ल.’ हा परिसंवाद झाला. प्रा. मिलिंद जोशी यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. “कोहिनूर प्रस्तुत आणि अँड एन्टरटेन्मेंट’च्या सहयोगाने “आशय फिल्म आणि सांस्कृतिक क्लब’तर्फे याचे आयोजन केले गेले.
“वादक पु.ल.’, “गायक पु.ल.’ आणि “संगीतकार पु.ल.’ हे अनेक अर्थाने नावीन्यपूर्ण वाटतात. चित्रपट गीते ते अतिशय भावविवशतेने गायचे. चित्रपटातही त्यांनी सहाभिनय गायन केले आहे. त्यांच्या गळ्यात गाणे फिरत असे. संगीताच्या माध्यमातून पुलं शब्दांच्या अधिक जवळ गेले. पुलंनी 88 गाणी ध्वनीमुद्रित केली आहेत. पुलंमधल्या संगीतकाराच्या द्रष्टेपणाची प्रचिती “नाच रे मोरा’ या बालगीतातून येते, असे डॉ. आशुतोष जावडेकर म्हणाले.
पु.ल. हे काळाच्या पुढे गेलेले व्यक्तीमत्व होते. आनंदवनाशी त्यांचे एक वेगळे नाते होते. तेथे गेल्यानंतर मी आयुष्याची बॅटरी रिचार्ज करतो, असे ते म्हणायचे. पु.ल. कालबाह्य होत आहेत की काय अशी कुजबूज ऐकायला मिळते. परंतू, पुलं हे चिरंतन आहेत, असे मत डॉ. मंदार परांजपे यांनी व्यक्त केले.
प्रकाश मकदुम म्हणाले, “पुलंचा चित्रपटांमधील वावरअगदी सहज सुलभ होता. पुलंचे चित्रपट म्हणजे “सबकुछ पुलं’ असे अनुभवायला येते. “गुळाचा गणपती’ हे त्याचे उत्तम आहे. रवींद्रनाथ टागोर आणि चार्ली चाप्लीन ही पुलंची प्रेरणास्थाने होती. पुलंनी 28 चित्रपट केले. परंतु, चित्रपटसष्टीतील भावनाशून्य व्यवहारामुळे त्यात त्यांचा जम बसला नाही. नाखुशीनेच त्यांनी चित्रपट सृष्टीला रामराम ठोकला.’
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “पुलंमधल्या विनोदात मला एक तत्ववेत्ता दिसतो. व्यंगाला अव्यंगाकडे नेले की तत्वज्ञानाकडे प्रवास सुरू होतो. पुलंच्या साहित्यातून व्यक्त होणारे अनुबंध त्यांच्यात असलेल्या तत्ववेत्याला जोडले गेले होते.’
महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार आणि नयनीश देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत, आनंद देशमुख यांनी उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
पुलंच्या साहित्यावर व्यक्त होणे हे टोकाचे अवघड आणि टोकाचे साधे, सोपे, सरळ आहे. यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत, समाजवाद्यांपासून संघवाद्यापर्यंत, विवेक मासिकापासून ते साधना मासिकापर्यंत सर्व विचारधारांमध्ये जे चुकीचे आहे, ते खुलेपणाने बोलायचे. पुलंची ही टीका सर्वांनी सकारात्मकतेने घेतली. अलीकडे जात, पंथ, धर्म, विचारधारा बघून पुस्तके विकत घेण्याकडे कल दिसून येते. परंतु, केवळ पुलंचं साहित्य समाजातील सर्व स्तरातील घटकांपर्यंत संवाद साधते.
– प्रवीण तरडे, अभिनेते तथा दिग्दर्शक