पिंपरी (प्रतिनिधी) – शहरात केंद्रातील किंवा राज्यातील बडे नेते येणार असल्यास सर्व प्रकारची काळजी स्थानिक प्रशासनाकडून घेतली जाते. महापालिकेसह इतर सर्व विभागांची धावपळ सुरू होते. व्हीआयपी व्यक्ती ज्या रस्त्याने प्रवास करणार आहेत, तो रस्ता चकचकीत करण्यापासून ते रस्त्याच्या बाजूचे, पदपथावरील अतिक्रमण हटविण्यापर्यंत सर्व कामे उत्तम रित्या पार पाडली जातात. दृष्टीस पडणारी प्रत्येक गोष्ट उत्तम दिसेल याची विशेष काळजी घेतली जाते. एकंदर जी कामे कायम होणे अपेक्षित आहे ती केवळ व्हीआयपी दौऱ्याच्या वेळीच अतिघाईने केली जातात. त्यामुळे असे व्हीआयपी दौरे शहरात आणि आसपासच्या परिसरात नियमित व्हावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
इतरवेळी का सूचत नाही?
व्हीआयपी दौ-यांच्या वेळी प्रशासनाकडून अशी कामे तात्काळ केली जातात. त्यामुळे एक प्रकारे नागरिकांना देखील त्याचा फायदा होतो. काही वेळेसाठी का होईना शहर स्वच्छ होते. इतर वेळी विद्रुपीकरण का दिसत नाही. ही आवश्यक कामे कायमस्वरुपी का सुचत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत असे व्हीआयपी दौरे शहरात नियमित होत राहावेत, अशी उपरोधिक मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी श्रीक्षेत्र देहू येथे येणार आहेत. ज्या रस्त्याने ते प्रवास करणार आहेत, त्या रस्त्यांची डागडुजी, आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे. इतर दिवशी पदपथावर वाहने, टपऱ्या लावल्या जातात. पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात असतात, त्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. असे पदपथ मोदींच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर मोकळे केले जात आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा साईड पट्ट्यांवर मुरुमीकरण करणे, पथदिवे बसवणे, रस्त्यांवर व इतरत्र लावलेले फलक, बॅनर काढणे, रस्त्यालगत असलेले बोर्ड हटवणे, अशी कामे केली जात आहेत. ही कामे कायमस्वरुपी होणे गरजेचे असताना इतर वेळी मात्र प्रशासन ढिम्म राहते.
महावितरणकडून विद्युत तारा, विद्युत डीपी दुरुस्त करणे सुरू आहे. महावितरणची ही कामे सातत्याने सुरु असतात पण ती सध्या युद्ध पातळीवर होत आहेत. बंद पथदिवे सुरू करणे, पथदिव्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या विद्युत तारांमध्ये अडकणाऱ्या झाडांच्या फांद्या कट करणे अशी कामे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. नालेसफाई, भूमिगत मलनिःस्सारण वाहिन्या स्वच्छ करण्याचेही काम सुरू आहे.
अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शहर दौऱ्यापूर्वी ते जिथे जिथे जाणार होते त्या परिसराचा प्रशासनाने तात्पुरता का होईना, कायापालट केला होता. त्यांचा दौरा संपल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली होती. पिंपरी-चिंचवड शहरात नुकताच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दौरा केला. ते पिंपरी येथील एका स्वायत्त विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी आले होते. त्यावेळी पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरातील रस्त्याच्या बाजूला झालेले अतिक्रमण हटवले होते. स्वच्छता आणि इतर अनुषंगिक कामे करण्यात आली होती.