रेणू दांडेकर यांचे मत: “ग्लोबल पुलोत्सवा’चा समारोप
पुणे – सहवेदनेने घायाळ होणारे लेखक म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे अतिशय संवेदनशील होते. सहवेदनेने ते घायाळ व्हायचे, पण तरीही त्यांनी नेहमीच लोकांना हसवून जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला. आजच्या ताणतणावाच्या काळात पुलंचे लेखन हे या ताणतणावावरील सगळ्यात महत्त्वाचे औषध आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू दांडेकर यांनी व्यक्त केले.
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “पु. ल. परिवारा’च्या सहयोगाने, “आशय सांस्कृतिक’ व “स्क्वेअर-1′ ने वर्षभर आयोजित केलेल्या “ग्लोबल पुलोत्सवा’च्या समारोप सोहळ्यानिमित्त रेणू दांडेकर यांना ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांच्या हस्ते “पु.ल. कृतज्ञता सन्मान’ प्रदान करण्यात आला. शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 25 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन्मान प्रदानानंतर दांडेकर यांच्याशी राजेश दामले विशेष संवाद साधला.
यावेळी दांडेकर म्हणाल्या, “ताणविरहित जीवन कसे जगावे, याचे मार्गदर्शन करणारी अनेक सत्रे अलीकडे होत असतात. त्या ऐवजी पुलंच्या लेखनाचे वाचन केले, तरी आपल्याला सकारात्मक जगण्याचा, शांतीने जगण्याचा मार्ग निश्चितच सापडू शकतो. त्याच्या आधारे आपण चिरतरुण राहून नव्या उमेदीने जीवन जगू शकतो एवढी ताकद पुलंच्या साहित्यात आहे.’ यावेळी ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांनी पुलंच्या पर्यटनविषयक आठवणींना उजाळा दिला.