नवी दिल्ली – शेतकरी आंदोलकांनी आजच्या चक्का जाम आंदोलनाच्या निमीत्ताने देशभर जो सत्याग्रह आयोजित केला आहे तो देशहिताचाच आहे असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे हे देशहिताचे नाहीत, त्यामुळे त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी चालवलेले आंदोलन देशहिताचेच आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, केंद्र सरकारने आणलेले हे तीन कृषी कायदे केवळ शेतकरी आणि शेतमजुरांच्याच हिताला बाधा आणणारे आहेत असे नव्हे तर संपुर्ण देश आणि देशातील जनतेच्याही हिताला त्यामुळे बाधा पोहोचणार आहे.
त्यामुळे त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी चालवलेल्या या सत्याग्रहाला आमचा पुर्ण पाठिंबा आहे असेही त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीही ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधत भीतीची भिंत उभारून तुम्ही आम्हाला का घाबरवत आहात असा सवाल मोदी सरकारला केला आहे.