– विनोद मोहिते
इस्लामपूर – इस्लामपुरातील जुनी भाजी मंडई स्थलांतराचा प्रश्न आतां लोकप्रतिनिधींच्या म्हणजेच नगरपालिका सभागृहाच्या कोर्टात गेला. २२ फेब्रुवारीला नगरपालिकेची सभा आहे. यात आयत्यावेळी विषय मांडून यावर निर्णय अपेक्षित आहे. शनिवारी सकाळी जुन्या मंडईत विक्रेत्यांना
बसण्यास पोलिसांनी अटकाव केला गेला.
अनधिकृतपणे प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगरल्याने विक्रेत्यांनी थेट नगरपालिका आवारामध्ये मंडई भरवली होती. नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच हा प्रकार घडला. सकाळी साडे दहा वाजता नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी नगरपालिकेच्या आवारात धाव घेत विक्रेत्यांशी संवाद साधला.
ते म्हणाले ,” २२ फेब्रुवारीपर्यंत भाजी मंडईत बसा.परंतू सभागृहाचा निर्णय मान्य करावाच लागेल.त्याला उपस्थित सर्व व्यापारी व शेतकऱ्यांनी मान्यता दिली. त्यानंतर मंडई विसर्जित झाली.
नगरपालिका सभागृहात धोरणात्मक निर्णय..
इस्लामपूर नगरपालिका आवारात भाजी मंडई भरवणे हे योग्य नाही. त्याने काहीही साध्य होणार नाही भाजी मंडईत शासकीय नियमांचे पालन करुन विक्रेत्यांनी २२ तारखेपर्यंत बसावे. भाजी मंडई जागेबाबत २२ फेब्रुवारी होणाऱ्या नगरपालिका सर्वसाधारण सभेत धोरणात्मक निर्णय होईल. तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल. अशी भूमिका नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मांडली.
सध्यापेक्षा अद्ययावत भाजी मंडईचा वापर करावा –
भाजीपाला विक्रेते व व्यापा-यांनी रस्त्यावर बसण्यापेक्षा नगरपरिषदेने बांधलेल्या अद्यावत भाजीमंडईचा वापर करणे आवश्यक आहे. नुतन मंडईत विक्रेत्यांचा व्यवसाय होणे हा नागरिकांच्या सवयीचा भाग आहे. त्यासाठी वेळ द्यावा लागेल. भाजीपाला विक्रेत्यांना पाठिंबा देताना लोकप्रतिनिधींनी सारासार विचार करावा असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.
भाजी मंडईच्या नामकरणावरुन काहींचा विरोध
मा.अण्णासाहेब डांगे चौक येथील सर्वसोयीनियुक्त छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई केली आहे. तेथेच व्यापारी व शेतक-यांनी बसावे ही नगरपालिका प्रशासनाची भुमिका आहे. परंतू काही लोक नवीन भाजी मंडईच्या नामकरणावरुन विरोध करत असून भाजी विक्रेते व व्यापा-यांना भडकवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी केला आहे.
अन्यथा आंदोलन सुरुच ठेवणार
जुनी भाजी मंडईत अनेक वर्षापासून व्यापारी व शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी बसतात.दोन दिवसांपासून नगरपालिका प्रशासनाशी चर्चा करत आहेत. आज शनिवारी भाजीपाला विक्रेत्यांना मंडईत बसण्यास मज्जाव केल्याने सर्व व्यापारी नगरपालिका आवारात बसले होते. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक कपील ओसवाल यांनी दिला आहे.