शिक्षक भरती घोटाळ्यासंबंधी ईडी किंवा सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आलेल्या पार्थ चटर्जी यांना पश्चिम बंगाल सरकारने मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे.
पार्थ चटर्जी यांच्याकडे उद्योग, वाणिज्य, माहितीतंत्रज्ञान, संसदीय कार्य यासह विविध खात्यांची जबाबदारी होती. त्यांच्याकडे तृणमूल कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदाचा कार्यभारही होता. एक प्रकारे तृणमूलमध्ये द्वितीय स्थानावर असलेल्या पार्थ यांच्यामुळे पक्ष व सरकारची निंदानालस्ती झाली आहे, हे लक्षात आल्यामुळे मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी लागली आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे व मला गोवण्यात आले आहे, असे पार्थ यांनी म्हटले आहे. तर त्यांची निकटवर्तीय अभिनेत्री अर्पिता मुखर्जी हिलाही ईडीने अटक केली आहे. पार्थ यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आहे, याची कबुली तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सौगत राय यांनी दिली आहे.
अर्पिता यांच्या घरातून 50 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. हे जे काही घडले आहे, त्याची कोणतीही पूर्वकल्पना पक्षाला नव्हती आणि जेव्हा आम्हाला त्याची माहिती झाली, तेव्हा आम्ही तात्काळ कारवाई केली, असा युक्तिवादही राय यांनी केला आहे. दीदींच्या डोळ्यांखालीच हा भ्रष्टाचार चालू होता, असा आरोप भाजपचे नेते शुभेन्दू अधिकारी यांनी केला आहे. शुभेन्दू हे तृणमूलमधून भाजपात गेले आहेत आणि त्यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत दीदींचा पराभवही केला होता. परंतु शुभेन्दू यांचा आरोप हा बोगस असून, दीदींना याची अजिबात कल्पना नव्हती. त्यांच्याकडे काही पुरावा असेल, तर शुभेन्दू यांनी ईडीकडे सोपवावा, असेही तृणमूलच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र दीदींना या गोष्टीची कल्पनाच नसेल, तर त्यावरून मुख्यमंत्री म्हणून त्यांची अकार्यक्षमताच सिद्ध होते. प. बंगालचा गृहविभाग, गुन्हा अन्वेषण खाते, अँटी करप्शन ब्युरो यापैकी कुणालाही या प्रकरणाचा सुगावा लागला नसेल, तर ते आश्चर्यच आहे. प्राथमिक शिक्षकांच्या भरतीत घोटाळा झाल्यामुळे शेकडो अपात्रांची निवड झाली आणि तेवढेच पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यावर अन्याय झाला. हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचा खेळखंडोबाच झाला आहे.
अर्पिता ही मॉडेल, टीव्ही व चित्रपट अभिनेत्री, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि उद्योगिनी आहे. तिच्या फ्लॅट्सवर करोडो रुपयांच्या नोटांची बंडले सापडली. अटक झाल्यानंतर तिची शुद्ध हरपली. पैसे खाताना ज्यांना लाज वाटत नाही, त्यांचे डोके अटक झाल्यानंतरच ठिकाणावर येते. अर्पिताने काही उडिया चित्रपटांतही काम केले आहे. 50 कोटींची रोख रक्कम, 79 लाख रुपयांचे दागदागिने, 54 लाख रुपयांचे परकीय चलन आणि 22 मोबाइल तिच्याकडे सापडले. पार्थ यांची ती जवळची मैत्रीण असून, उभयतांची छायाचित्रेही उपलब्ध आहेत. अर्पिताचे लग्न एका व्यावसायिकाशी झाले होते. मात्र त्यापासून ती विभक्त झाली. पार्थ यांच्याशी मैत्री झाल्यानंतर, त्यांच्याबरोबर अनेक सभांमध्येसुद्धा ती सहभागी झाली. त्यामुळे आपला तिच्याशी काहीही संबंध नाही, असे पार्थ म्हणू शकत नाहीत.
तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपचे संबंध अत्यंत विकोपाला गेले, ते मागच्या विधानसभा निवडणुकीत. तेव्हा देशात महाशक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपचा पाडाव करून तृणमूल तिसऱ्यांदा सत्तेवर आली. भाजपच्या तपासयंत्रणा तृणमूलचा छळ करत आहेत, असा आरोप दीदींनी सातत्याने केला आहे. काही बाबतीत हे खरे असले, तरी सारडा, नारदा अशी गैरव्यवहारांची प्रकरणे तेथे घडली असून, त्यात तृणमूलच्या अनेक नेत्यांचा समावेश होता. काही नेत्यांनी भाजपात प्रवेश करून आपले शुद्धीकरण करून घेतले.
प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममतादीदींशी जाहीरपणे अनेकदा संघर्ष केल्याचे पारितोषिक म्हणून त्यांना उपराष्ट्रपतिपद दिले जात आहे. हे सर्व वास्तव जरी असले, तसेच ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या यंत्रणांचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत आहे, हेही सत्य असले, तरी कुठेतरी आग आहे म्हणूनच धूर दिसतो. पंजाबमधील आप सरकारच्या एका मंत्र्यास खाबूगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गचांडी दिली. अशी कारवाई केल्यानंतर, बघा आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध कसा बडगा उचलतो, असे दाखवले जाते. मान असोत वा दीदी असोत, त्यांनी हेच केले आहे. परंतु मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या कारकिर्दीत व्यापम घोटाळा झाला. त्या प्रकरणात 40-45 लोकांचा संशयास्पद मृत्यू झाला. मात्र या सगळ्या प्रकरणावर पांघरूण घालण्यात आले. न्यायालयात सरकारने पुरावेच सादर करायचे नाहीत आणि आरोपींना निर्दोष सोडायचे, ही सध्याची पद्धत आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी जमीन व खनिज घोटाळा केला होता. अनेक बडे भाजप नेते संबंधितांना लाखो करोडो रुपये देत, अशा नोंदी त्यांच्या डायरीत सापडल्या होत्या. सीबीआयकडून त्यांचा तपास सुरू होता, परंतु केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर, अचानकपणे सीबीआयला पुरेसा पुरावा मिळेनासा झाला. बेल्लारी येथील भाजपशी संबंधित असलेल्या रेड्डी बंधूंनी 16 हजार 500 कोटी रुपयांचा खनिज गैरव्यवहार केला. परंतु पक्षाला त्यांची गरज असल्यामुळे, रेड्डी बंधूंविरुद्ध तक्रार करणाऱ्या आणि व्हिसलब्लोअर बनलेल्या वनाधिकाऱ्यास नोकरीतून निलंबित करून ती फाइल बंद करण्यात आली. आसाममधील पाणीपुरवठा घोटाळ्यात हेमंत बिश्व सरमा यांच्यावर आरोप करण्यात आले होते.
भाजपने त्यांच्याविरुद्ध एक पुस्तिकाही प्रसिद्ध केली होती. एका अमेरिकन कंपनीस पाइपलाइनचे कंत्राट देताना त्यांनी पक्षपात केल्याचा आरोप अमेरिकन सरकारनेच केला होता आणि तसे आरोपपत्र दाखल केले होते. परंतु कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, सरमा हे पवित्र झाले आणि त्यांच्याविरुद्धचे आरोप बंद करण्यात आले. नारायण राणे, मुकुल रॉय हे नेतेही याच पद्धतीने वॉशिंग मशीनमधून बाहेर आले आणि स्वच्छ झाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल यांनी जमीन तसेच जलविद्युत प्रकल्प घोटाळे केले. त्यामुळे त्यांची भाजपने मुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली. परंतु
पुढे मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले होते. भ्रष्टाचार हा आपल्याकडे राजकारणाचा मुद्दा होतो आणि या विषयाचा फक्त राजकारणासाठी वापर केला जातो. प्रत्यक्षात व्यवस्था तशीच राहते.