श्रावण महिना म्हणजे श्रद्धा आणि भक्तिभावाचा महिना. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला “श्रावण’ अधिवेशन म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. परंतु, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज सध्या ज्या पद्धतीनं सुरू आहे; ते बघितल्यानंतर कुणालाही असं वाटेल की लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात आता कोणतीही समस्या राहिलेली नाही. अधिवेशन सुरू झाल्यापासून आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील 27 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
दोन्ही सभागृहांत गोंधळ शिगेला पोहचला आहे. वाढत्या महागाईवर चर्चा करावी, अशी विरोधी पक्षांच्या नेत्यांची मागणी आहे. यासाठी ते गोंधळ घालत आहेत. घोषणा देत आहेत. वारंवार ताकीद देऊनही गोंधळ शांत होत नसल्यामुळे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी तृणमूल कॉंग्रेसचे सात, द्रमुकचे सहा, टीआसएसचे तीन, आम आदमी पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रत्येकी दोन आणि भाकपाच्या एका खासदाराला निलंबित केले. दुसरीकडे, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या चार खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले आहे. सर्वपक्षीय बैठकीत एकजुटीने संसद चालविण्याच्या मुद्द्यावर एकमत झाले होते. परंतु, विरोधी पक्ष आता माघार घेत आहेत, असा दावा पियूष गोयल यांनी केला आहे.
कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख आक्षेपार्ह असा केला. या मुद्द्यावरून स्मृती इराणी यांनी जंग-जंग पछाडलं. एवढंच नव्हे तर, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी डिमांड त्यांनी ठेवली. यानंतर गॅलरीत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात तू-तू-मै-मै सुद्धा झाली. “डोंट टॉक टू मी’, असं सोनिया गांधी म्हणाल्यासुद्धा.
या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी स्मृती इराणी यांच्या व्यवहारावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “अधीर रंजन चौधरी यांच्या एका आक्षेपार्ह शब्दामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जेवढ्या दुखावल्या नसतील त्याच्यापेक्षा जास्त दु:ख स्मृती इराणी यांना झालं, असं वाटत आहे’.
भूतकाळातही अशाप्रकारच्या घटना घडल्या असल्याचे सांगताना श्रीवास्तव म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पहिल्यांदा मंत्री झाल्या होत्या तेव्हा भाजपने त्यांच्यासाठी “मंत्राणी’ असा शब्द वापरला होता. या मुद्द्यावरून खूप मोठा गोंधळ झाला होता. यानंतर विरोधकांनी जीभ घसरली, असं सांगून माफी मागितली आणि हा विषय संपला. त्यावेळेस इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, विरोधकांची जीभ घसरल्यामुळे हा प्रकार घडला आहे आणि आपण सर्वांनी हा मुद्दा सोडून दिला पाहिजे. परंतु, घटनात्मक पदाची अवहेलना होणार नाही याची काळजी आपण सर्व अर्थात सरकार आणि विरोधक यांनी मिळून घेतली पाहिजे. इंदिरा गांधी यांनी मोठं मन दाखवून विरोधकांना माफ केले आणि पुढच्या कामाला सुरुवात झाली. इंदिरा गांधी यांच्याएवढं मोठं मन भाजपजवळ नाही, असा टोमणा श्रीवास्तव यांनी मारला.
खरं सांगायचं म्हणजे, स्मृती इराणी यांचा एवढा तळतळाट होण्यामागे मोठं कारण आहे. विरोधी पक्षांनी इराणी यांच्या मुलीचा “कॅफे आणि बार’चा मुद्दा उचलून लावला होता. आपली मुलगी बार चालवित नाही तर ती शिकत आहे, असे त्यांनी स्पष्टसुद्धा केले होते. परंतु, हा मुद्दा त्यांच्या जिव्हारी लागला होता. इकडे, अधीर रंजन चौधरी यांची जीभ घसरली आणि इराणी यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली, असं म्हणायला हरकत नाही. परंतु, संसद रणांगण, अखाडा किंवा हिशेब चुकता करण्याचं ठिकाण नाही. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि या देशाच्या संसदेकडे बघून जगातील अन्य देश लोकशाही कशी मजबूत करायची याची प्रेरणा घेत असतात, हे सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. या देशाच्या घटनाकारांनी संसद आणि संसदेच्या शाखांची रचनाच अशाप्रकारे केली आहे की, देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या पक्षाचे लोक निवडून या मंदिरात येत असले तरी संसदेचे कामकाज निरपेक्ष आणि भेदभावरहित राहील. म्हणूनच दोन्ही सभागृहाच्या सभापतींना “न्यायाधीश-समान’ अधिकार देण्यात आले आणि त्यांची कार्यवाही न्यायालयीन कक्षेबाहेर ठेवण्यात आली. परंतु, ही बाब पूर्णपणे अनाकलनीय आहे की, अधीर रंजन चौधरी यांच्या हातून झालेल्या चुकीसाठी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी माफी मागावी, अशी मागणी काही मंत्री आणि खासदारांनी करावी. खरं सांगायचं झालं तर, चौधरी यांच्यामुळे कॉंग्रेस, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची फजिती होण्याची ही पहिलीच वेळ नव्हे.
चौधरी यांना लोकसभेच्या संसदीय पक्षाचे नेते बनवून कॉंग्रेस पक्षाने मोठी चूक केली, असे सर्वांचे मत आहे. त्यांच्यामुळे पक्षाची प्रतिष्ठा कितीतरी वेळा पणाला लागली आहे. मुळात, चौधरी यांच्या विधानाची आच सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच त्यांनी प्रकरण सावरून घ्यायला हवे होते. सत्ताधारी पक्षाकडून लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला गेला. यानंतर ज्या संतापाने स्मृती इराणी भाजपच्या खासदारांचे नेतृत्व करत होत्या, हे बघून प्रकरण खूप “गरम’ झाले आहे ही बाब चौधरी यांच्या लक्षात यायला हवी होती आणि त्यावर “थंड पाणी’ टाकण्याची व्यवस्था करायला हवी होती. चौधरी यांनी लगेच माफी मागितली असती तर प्रकरण एवढे चिघळले नसते आणि सोनिया गांधी यांच्यापर्यंत आच पोहचली नसती. मात्र, एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. स्मृती इराणी यांच्याकडून सोनिया गांधी यांच्यावर हल्ले होणे नवीन नाही. इराणी यांच्याकडून हल्ले होण्याची सुरुवात झाली ती 2014 मध्ये. सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी-वढेरा यांचे पती रॉबट्र वढेरा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने लावले होते. या घटनेपासून स्मृती इराणी यांनी आपली तलवार म्यान केलेली नाही.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात स्मृती इराणी यांनी अमेठीतून निवडणूक लढविली होती. यानंतर लोकसभेत इराणी यांचे जे रूप बघायला मिळाले होते ते अजूनही लोकांच्या लक्षात आहे. 2014 मध्ये राहुल गांधी यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु, 2019 मध्ये इराणी अमेठीतून निवडून आल्या. अमेठीत पाऊल ठेवल्यापासून गांधी कुटुंब आणि स्मृती इराणी यांच्यात पडलेल्या ठिणगीने आता वणव्याचे रूप घेतले आहे. इराणी यांनी गांधी कुटुंबावर अनेक हल्ले केलेत. परंतु, सोनिया गांधी यांच्यावर थेट हल्ला यापूर्वी कधीच केला नव्हता.
भाजपची कार्यपद्धती लक्षात घेता काही राजकीय विश्लेषकांच्या मते, सोनिया गांधी यांना घेरणे ही भाजपची रणनीतीसुद्धा असू शकते. कारण, अमेठीनंतर भाजपच्या निशाण्यावर रायबरेली आहे. स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी यांना घेरले आणि नंतर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पियूष गोयल आणि प्रल्हाद जोशी या सर्वांनी हल्ला चढवायला सुरुवात केली. 2024 मध्ये रायबरेलीवर ताबा मिळवायचा अशी भाजपची व्यूहरचना आहे. याची चुनूक उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीतच बघायला मिळाली होती. रायबरेली लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार आमदारांना भाजपने पक्षात सामील करून घेतले. लोकसभेत बघायला मिळालेली ही लढाई 2024 मध्ये कोणते रूप धारण करते, ते बघावे लागेल.