नवी दिल्ली : भाजप सत्तेत आल्यापासून वारंवार इतिहास बदलल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यातच आता चक्क स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ज्या घरात शेवटपर्यंत वास्तव्य होते, त्याच घरावरून आता त्याचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देशाची राजधानी दिल्लीत तीन मूर्ती कॉम्प्लेक्समध्ये पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर वास्तव्यास होते. १६ वर्षं पंडित नेहरू तिथेच वास्तव्यास होते. गेल्या वर्षीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी ‘पंतप्रधान संग्रहालया’चे उद्घाटन केले होते . त्यानंतर अवघ्या वर्षभरातच हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता याच एनएमएमएलनं या म्युझियमला दिलेले जवाहरलाल नेहरूंचं नाव वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
नेहरूंपासून मोदींपर्यंत सर्व पंतप्रधानांविषयी या संग्रहालयात माहिती, दस्तावेज, फोटो ठेवण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने आता या संग्रहालयाच्या नावातून नेहरुंचे नाव काढण्याचा निर्णय झाला आहे. त्याऐवजी आता हे संग्रहालय ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ या नावाने ओळखले जाणार आहे.
पंडित नेहरूंचे नाव वगळण्याचा निर्णय घेणाऱ्या एनएमएमएल सोसायटीच्या अध्यक्षपदी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत. याशिवाय इतर २९ सदस्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी अशा इतर काही मंत्री व नेत्यांचा समावेश आहे.
यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनामध्ये उपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. “या सोसायटीच्या नव्या रुपात पंडित जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत देशाच्या सर्व पंतप्रधानांविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच, त्यांनी सामना केलेल्या आव्हानांचीही इथे माहिती आहे. पंतप्रधान हे एक पद नसून ती एक स्वतंत्र संस्थाच असते. कोणतंही इंद्रधनुष्य सुंदर दिसण्यासाठी त्यातील सर्व रंगांचं योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व होणं आवश्यक असतं”, असे राजनाथ सिंह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान. यावरून आता विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे.