-आसावरी केळकर-वाईकर
पंडित जसराजजी यांच्या बहुतांशी बंदिशींचे कृष्णमय शब्द ऐकताना अक्षरश: भान हरपून जायचं. बंदिशीच्या शब्दांना न्याय देत रसाळपणे श्रोत्याला रसोत्पत्तीच्या परमोच्च बिंदूवर पोहोचलेल्या आपल्या सुरांनी न्हाऊ घालणे ही त्यांची खासियत!
पंडितजी यांच्या जाण्याची बातमी ऐकली आणि मन पूर्ण निर्विकार झाल्याचं जाणवलं. काहीच उमटत नव्हतं मनात! मोबाइल बाजूला ठेवून खुर्चीत विसावले आणि मनानं खूप वर्षे मागं नेलं. अगदी शालेय वय होतं… नुकताच घरात टीव्ही आला होता आणि कुठलाही गाण्याचा कार्यक्रम त्यावर लागला की वडिलांची हाक यायचीच… हातातलं काय असेल ते सोडून हाकेला ओ देत धावायचं आणि “बैस इथं, ऐक नीट’ असं त्यांनी म्हणताच टीव्हीला डोळे लावून पाहताना काय सुरू असेल ते सगळं कानात साठवायचा प्रयत्न करायचा… मधेच वडील आवर्जून मला कळाव्या म्हणून काही गोष्टींबाबत महत्त्वाच्या टिप्पण्या करायचे त्याही मनात साठायच्या, अर्थ लागला न लागला तरी… पुढं केव्हातरी आपसूक एखाद्या क्षणी अर्थ उमजायचा! एकदा असाच टीव्हीवर कार्यक्रम सुरू झाला आणि वडिलांनी मला हाकारलं… मी धावत आले तर कुणीतरी मैफिलीची अगदी नुकतीच सुंदर सुरात खूप सुरेल सुरुवात करत होतं आणि कॅमेरा त्याचवेळी फिरून प्रेक्षागृहातल्या पहिल्या रांगेत स्थानापन्न झालेल्या धोतर-झब्बा-खांद्यावर शेला अशी सुंदर वस्त्रं परिधान केलेल्या एका व्यक्तीवर स्थिरावला आणि वडिलांनी सांगितलं, “हे बघ… हे पंडित जसराज!’ ती त्यांच्या नावाची झालेली पहिली ओळख!
ते खुर्चीच्या हातावर कोपर टेकवून तर्जनी आणि मधलं बोट गालावर आणि उरलेली तीन बोटं हनुवटीवर ठेवून अतिशय कौतुकभरल्या नजरेनं एकाग्रपणे त्या गायकाकडं पाहात होते, त्याला ऐकत होते. पुन्हा कॅमेरा गायकाकडे वळला आणि जेमतेम वीस-बाविशीचा तो तरुण स्क्रीनवर दिसू लागला. काहीही ढिम्म कळत नसलेल्या लहानग्या वयातही एकूणच “सौंदर्याची व्याख्या’ माझ्या मनात रुजवण्यात त्या गायकाचे सूर आणि जसराजजींच्या चेहऱ्यावरच्या त्या सुखद भावांचा खूप मोठा सहभाग असावा असं आज वाटतं. मी अजून हातावर ताल देत मात्रा मोजत आलापाचे सूर त्यात बसवण्याच्या पायरीवरच होते तेव्हां… मात्र एखाद्या सुंदर सुरानं मनाला स्पर्श करून तिथं घर करायला वय, ज्ञान, समज काहीकाही आड येत नाही. तो सूर आणि मैफिलीच्या सरत्या काही क्षणांमध्ये कॅमेऱ्यानं टिपलेला पं. जसराजजींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओसंडणारा क्षण ह्या गोष्टी तेव्हापासून काळजात घर करून आहेत. नंतर कळलं की तो युवा गायक म्हणजे “प्रतिजसराज’ म्हणून नावारूपाला येत असलेला त्यांचा पट्टशिष्य संजीव अभ्यंकर! आपण घडवलेलं सुंदर शिल्प आपल्या नजरेनं न्याहाळून त्याचा आनंद लुटण्यातलं सुख त्यादिवशी जसराजजींच्या डोळ्यांत दाटलं होतं.
पुढं त्यांना ऐकताना तलम, मुलायम, लडिवाळ, मनाला खोलवर स्पर्श करणारा आणि महत्त्वाचं म्हणजे मन शांतावणारा सूर म्हणजे जसराजींचा सूर ही व्याख्याच मनावर कोरली गेली. पुढे काही दिवसांतच त्यांची “दिन की पूरिया’ ही कॅसेट आलेली आठवते. त्यावेळी शास्त्रीय संगीताच्या कॅसेट सर्वात महाग म्हणजे पन्नास रुपयाला असायच्या आणि फार कॅसेट्स उपलब्ध असायच्या असंही नव्हतं. हातावर कुणी दोन-पाच रुपये ठेवले तरी खूश होण्याचा तो काळ होता. तेवढ्यातही एखादं चांगलं वही-पेन नक्की विकत घेता यायचं. त्यापुढे पन्नास रुपये ही मोठीच किंमत म्हणायला हवी. त्यामुळे गाण्याच्या ओळखीच्या ग्रुपमध्ये खरेदी करताना प्रत्येकानं वेगवेगळी कॅसेट घ्यायची आणि फिरवून फिरवून त्या सगळ्या कॅसेट प्रत्येकानं ऐकायच्या असं चालायचं. तेव्हा मी आवर्जून जसराजजींची “दिन की पूरिया’ आणलेली आठवते, त्याच्या दुसऱ्या बाजूला “मुलतानी’ होता. ती कॅसेट कितीवेळा ऐकली असेल याची गणतीच नाही. कॅसेटच्या कव्हरवर असणारं जसराजजींचं छायाचित्र म्हणजे अगदी ऋषितुल्य, प्रसन्न व्यक्तिमत्त्व वाटायचं. गाणं ऐकता ऐकता त्या छायाचित्राकडं पाहत राहणे हासुद्धा मोठा आनंद होता. अगदी शालेय वयात गाणं म्हणावं असं काही कळत नसताना, दिन की पुरिया आणि मुलतानीचे आरोह-अवरोहही माहीत नसताना किंबहुना रागांची ही नावंसुद्धा ऐकलेली नसताना फक्त सुरानं मोहून जाऊन कॅसेट पुनःपुन्हा ऐकणं ही गोष्ट विलक्षणच म्हणायला हवी… ती ताकद त्या सुरांची होती, त्या लडिवाळ सुरानं मनावर घातलेल्या मोहिनीचा तो परिणाम होता!
त्यानंतर दोन-तीन वर्षांतच केव्हातरी आमच्या सांगलीच्या ग्राऊंडवर मोठा मंडप घातलेल्या भव्य स्टेजवरच्या मैफिलीत जसराजजींना तल्लीनतेनं गाताना डोळे भरून पाहिल्याचं आणि काना-मनात तो सूर खोलवर साठवून ठेवल्याचं आठवतं. सुरांत हरवून जाणं म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहताना, त्यांना ऐकताना उमजत होतं. सुरांतली भावगर्भता हा मला भावलेला जसराजजींचा सगळ्यात मोठा पैलू! त्यांच्या गायकीविषयी मी काही लिहावं हे अगदीच संयुक्तिक नाही, परंतु आपापल्या परीनं प्रत्येकजण कलाकाराच्या गाण्यातली सौंदर्यस्थळं शोधत असतो किंबहुना ती आपसूकच श्रोत्याच्या मनात उमटत जातात. त्यांच्या बाबतीत मला जे भावलं ते म्हणजे त्यांच्या सुरांतली मनाला स्पर्शणारी, मनात खोलवर झिरपत जाणारी भावगर्भता! जसराजजींचं महत्तम योगदान म्हणजे दुसऱ्याला भावविभोर करणाऱ्या आपल्या सुरांनी त्यांनी अत्यंत सर्वसामान्य माणसाला शास्त्रीय संगीताची गोडी लावली.
मला खरंच नेमके माहीत नाही (पण विश्वास ठेवण्यासही काही हरकत वाटत नाही) मात्र, कॉलेजवयातच कधीतरी कोणाकडूनतरी हा किस्सा ऐकला होता. त्यांच्याकडं खूपजण शिकायला जायचे… तर सुरुवातीला ते प्रत्येकाला काही पलटे घोटायला द्यायचे. खोलीमध्ये चहूबाजूंना दोऱ्या बांधल्या होत्या आणि त्यात मणी ओवलेले होते. एकदा पलटा म्हटला की एक मणी पुढे सरकवायचा. अशाप्रकारे ठराविक मेहनत झाल्यावर मग शिष्याची खरी तालीम सुरू व्हायची म्हणे! हे ऐकून इतकंच कळलं होतं की गाणं हे खायचं काम नाही.
आज स्वर्गाच्या द्वारी सुशोभन असेल आणि साक्षात कृष्णपरमात्मा, त्यांचा कृष्णलल्ला त्यांच्या स्वागताला हजर असेल… त्यानं त्यांना मिठीत घेऊन आपुलकीनं स्वर्गात पाचारण केलं असेल आणि त्यांच्या रसाळ, भावगर्भ सुरांत “ओम् नमो भगवते वासुदेवाय’ ऐकायला “तो’ आतुरला असेल! भगवद्गीतेतल्या त्याच्याच
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक्ः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत्ः।।
ह्या आत्म्याच्या व्याख्येनुसार तशाच आत्मीय सुराचं “त्यानं’च जसराजजींना दिलेलं वरदान तो आता अंतरी अनुभवत असेल…!
शाममुरारी.. त्यांच्या सुरांच्या रूपानं कायमस्वरूपी आनंदाचा ठेवा आमच्याही आयुष्यात ठेवलास त्यासाठी तुझे अपार ऋण!