चंदीगढ/नवी दिल्ली – भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या पाच जणांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळ्या घालून ठार केले. पंजाबमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना ठार करण्याची ही सर्वात मोठी संख्या आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या 103 व्या बटालीयनला पंजाबमधील तरण तारण जिल्हयात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ काही संशयास्पद हालचाली दिसल्या. सीमेवरून घुसखोरी करणाऱ्याना थांबण्याचा इशारा जवानांनी केला. मात्र घुसखोरांनी गोळीबार केला. त्याला जवानांनी प्रत्यूत्तर दिले. त्यात पाच जण ठार झाले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अन्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भीकीविंड गावाशेजारील दाल सीमा नाक्यावर पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही चकमक झाली. सीमेच्या कुंपणावर संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर तेथे देखरेख ठेवली. त्यावेळी तेथे वाढलेल्या गवताच्या आड घुसखोर लपल्याचे दिसून आले.
या घुसखोरांकडे रायफली होत्या. सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या छायाचित्रात दोन मृतदेह एकमेकांवर पडल्याचे दिसत असून अन्यत्र तीन मृतदेह पडलेले आहेत. काही शस्त्रे आणि सामान पडलेले दिसत आहेत.
सीमा सुरक्षा दलाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळावर एक एके 47 रायफल आणि दोन पिस्तूल सापडली. या घुसखरांकडे आणखी शस्त्रे असल्याचा संशय असून ती शोधण्यासाठी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.