खेलरत्ननंतरही अर्जुनसाठी झाली होती शिफारस
पुणे – साक्षी मलिक व मीराबाई चानू यांना खेलरत्न पुरस्कार पूर्वीच मिळालेला असल्याने पुरस्कार निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती. सर्वात मोठा पुरस्कार मिळालेला असल्याने अर्जुन पुरस्कारासाठी त्यांचा विचार झाला नाही. मात्र, यात समितीची चूक झाली व नाहक बदनामी मात्र खेळाडूंची झाली. केंद्रीय क्रीडा मंत्रालयातील एका सदस्याने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
शुक्रवारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा केली व परंपरेप्रमाणे यंदाही यावर वाद निर्माण झाले. खरेतर ज्या खेळाडूंना मुळातच देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार समजला जात असलेला खेलरत्न पुरस्कार जर मिळालेला असेल तर पुन्हा अर्जुन पुरस्कारासाठी त्यांनी नव्याने शिफारस करण्यात काहीच अर्थ नव्हता. मात्र, तरीही या खेळाडूंच्या संघटनांनी साक्षी व मीराबाई यांची शिफारस का केली, असा प्रश्न मंत्रालयाला पडला होता. तसेच जरी संघटनांनी शिफारस केली असली तरी पुरस्कार निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीनेही ही शिफारस उचलून का धरली, असाही प्रश्न आता विचारला जात आहे. या खेळांची संघटना व समिती यांनी केलेल्या चुकीमुळे या खेळाडूंची नाहक बदनामी झाली आहे. वास्तविक या खेळाडूंना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने डावलले असे विनाकारण बोलले जात आहे. जर आधीच खेलरत्न मिळालेला आहे तर अर्जुन पुरस्कारासाठी त्यांचा विचारच होणार नाही हे माहीत असूनही त्यांची शिफारस केली गेली त्यामुळेच त्यांचा विचार झाला नाही, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी हे पुरस्कार जाहीर करताना स्पष्ट केले.
निवृत्त न्यायाधीश मुकुंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने 29 जणांची अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली होती. या यादीत रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदक विजेती कुस्तीपटू साक्षी तसेच 2017 साली झालेल्या वेटलिफ्टिंगमधील विश्वविजेती मीराबाई यांचाही समावेश करण्यात आला होता. करोनाच्या धोक्यामुळे यंदा प्रथमच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. दरवर्षी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.
दोन दशकांनी “खो-खो’पटूंना पुरस्कार…
महाराष्ट्राची अव्वल खो-खोपटू सारिका काळे हिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने गेल्या दोन दशकांपेक्षाही जास्त काळ लोटल्यानंतर या खेळात हा पुरस्कार दिला गेला. कर्नाटकच्या एन. शोभा यांच्यानंतर तब्बल 22 वर्षांनी सारिकाने हा पुरस्कार मिळवला आहे. 1970 ते 1998 या कालावधीत 13 खो-खोपटूंनी हा पुरस्कार मिळवला आहे. गेल्या तीन वर्षांत दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे यंदा अर्जुन पुरस्कारासाठी खो-खोपटूंचाही विचार व्हावा, अशी मागणी भारतीय खो-खो महासंघाकडून करण्यात आली होती.